ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह गेल्या कित्येक दिवसांपासून गायब आहेत. त्यांच्या आरोपांमुळे अनिल देशमुखांना राजीनामा द्यायला लागला. त्यांच्या घरावर सीबीआय, ईडी आणि इन्कमटॅक्सकडून धापासत्र सुरू आहे. मात्र, तक्रारकर्तेच गायब आहेत. अन् इकडे खटला सुरू आहे, असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंह यांचे नाव न घेतला लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱयावर आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी परमबीर सिंह यांच्यावर निशाणा साधला. ठाकरे म्हणाले, अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप करुन त्यांच्यामागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावणारे तक्रारदार गायब आहेत. ते न्यायालयात सुनावणीसाठीही येत नाहीत. तपासयंत्रणांपुढेही येत नसल्याने ते फरार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती चंडीवाल आयोगासमोर सुनावणी सुरू आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयासाठी नवी इमारत देणे हे माझे स्वप्न आहे. मी आज एक वचन देतो इमारतीचं भूमीपूजनाची तारीख तर ठरवूच आणि प्रयत्न असा करू की आपल्याच कारकिर्दीत त्याचं उद्घाटनही करू. त्या उद्घाटनासाठी मी सरन्यायाधीश रमण यांना आजच निमंत्रण देत आहे. न्यायदान ही केवळ न्यायालयाची जबाबदारी नाही. हे टीमवर्क आहे. आपल्या देशामध्ये जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. कार्यकारी यंत्रणा, कायदेमंडळ आणि प्रसार माध्यमे यांना लोकशाही पेलण्याचे कर्तव्य करायचे आहे. आम्हाला न्याय प्रक्रियेबाबत पूर्ण विश्वास आदर आहे. न्यायव्यवस्थेची प्रक्रिया आणखी गतीमान होण्यासाटी सरकार म्हणून जे काही करणं शक्मय आहे ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.