प्रतिनिधी/ पणजी
राज्यव्यापी कर्फ्यू कालावधीत तिसऱयांदा वाढ जाहीर करण्यात आली आहे. ही वाढ एका आठवडय़ाची असून दि. 28 जूनपर्यंत राज्यात कर्फ्यू राहणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी रात्री उशिरा ट्विटरवरून यासंबंधी घोषणा केली.
कोरोना साखळी अद्याप तुटलेली नसल्यामुळे सरकारने कर्फ्यू कालावधी आणखी एका आठवडय़ाने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात लागू असलेल्या कर्फ्यूचा कालावधी दि. 14 रोजी संपुष्टात आल्यानंतर त्यात दि. 21 जूनपर्यंत वाढ करण्यात आली होती. आता मुख्यमंत्र्यांनी तिसऱयांदा वाढ जाहीर करताना दि. 28 जून रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत कर्फ्यू राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ट्विटरमध्ये म्हटले आहे.
त्यानुसार राज्यातील पालिका तसेच पंचायत परिसरातील सर्व दुकाने, शॉपिंग मॉल सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत खुली ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. मासळी मार्केटही मर्यादित स्वरुपात खुली ठेवता येणार आहेत. मात्र चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स, करमणूक स्थळे, बंदच राहणार आहेत.
राज्यात रुग्णसंख्येत झालेली घट पाहता कोरोनाची लाट ओसरत असल्याचा दावा करण्यात येत असला तरीही चिंता अद्याप कायम आहे. नुकताच लसीकरणाचा तिसरा टप्पा प्रारंभ करण्यात आला आहे. 100 टक्के ध्येय साध्य करण्यासाठी वेगाने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. 100 टक्के लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत पर्यटन व्यवसाय सुरू करणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लवकरच त्यासंदर्भातील अधिकृत आदेश जिल्हाधिकाऱयांकडून जारी करण्यात येणार आहे.