प्रतिनिधी/ कारवार
जिल्हय़ात दुसऱया टप्प्यात होणाऱया ग्राम पंचायत निवडणुकीद्वारे वखर रिंगणात उतरलेल्या हजारो उमेदवारांच्या भाग्याचा फैसला लागणार हे खरे असले तरी उद्याच्या निवडणुकीद्वारे माजी पालकमंत्री आर. व्ही. देशपांडे आणि विद्यमान पालकमंत्री शिवराम हेब्बार यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्या जिल्हय़ाच्या किनारपट्टीवरील जोयडा, दांडेली, हल्याळ, यल्लापूर, मुंदगोड, शिरसी आणि सिद्धापूर तालुक्यातील 126 ग्राम पंचायतींच्या एक हजार 203 जागांसाठी 3 हजार 452 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 77 उमेदवारांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. तर वेगवेगळ्या कारणांमुळे दोन जागांसाठी निवडणूक होणार नाही. सात तालुक्यामध्ये हल्याळ, जोयडा, यल्लापूर, मुंदगोड आणि शिरसी-सिद्धापूर या तीन विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो.
हल्याळ-जोयडा मतदार संघांवर देशपांडे यांची पकड
जोयडा, हल्याळ आणि दांडेली तालुक्यांचा समावेश असलेल्या हल्याळ, जोयडा विधानसभा मतदार संघातील 40 ग्राम पंचायतींसाठी उद्या निवडणूक होत आहे. या मतदार संघावर काँग्रेसचे ज्येष्ठ अनुभवी आणि प्रभावी नेते व माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांची एखादा अपवाद वगळता गेली अनेक वर्षे पकड राहिली आहे. अलिकडेच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱयांच्या निवडणुकीत बाजी मारून देशपांडे यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तिन्ही तालुक्यातील ग्रामीण मतदारांवर आपला पगडा सिद्ध करण्यासाठी देशपांडे यांना ग्रा. पं. निवडणुकीद्वारे पुन्हा एक संधी चालून आली आहे. कोणत्याही परिस्थितीत जोयडा, हल्याळ व दांडेली तालुक्यातील जास्तीत जास्त ग्राम पंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी देशपांडे गांभीर्याने प्रयत्न करीत आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपला आपल्या मतदारसंघात पाय पसरायला वाव द्यायचा नाही. यासाठी आपला अनुभव खर्ची घालीत आहेत. जिल्हय़ातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी हल्याळ विधानसभा मतदार संघाचा अपवाद वगळता उरलेले पाच विधानसभा मतदार संघ भाजपने यापूर्वीच आपल्या घशात घातले आहेत. आता भाजपची नजर हल्याळ विधानसभा मतदार संघाकडे लागून राहिली आहे. ग्रा. पं. निवडणुकीद्वारे भाजप देशपांडे यांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी उतावीळ झाला आहे. तथापि देशपांडे, विधानपरिषद सदस्य श्रीकांत घोटणेकर, देशपांडे यांचे पुत्र प्रशांत देशपांडे आदी मान्यवर भाजपचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजप नेते आणि माजी आमदार सुनील हेगडे आणि इतरांना हल्याळ, जोयडा आणि दांडेली तालुक्यातील ग्रा. पं. काँग्रेसकडून हिसकावून घेण्यास यश येणार का? हे पाहण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागेल.
यल्लापूर-मुंदगोड तालुक्यातील ग्रा.पं.कडे काँग्रेसची नजर
यल्लापूर आणि मुंदगोड तालुक्यातील 31 ग्राम पंचायतींवर वर्चस्व राखण्यासाठी काँग्रेस आणि भाजप दरम्यान मोठी चुरस निर्माण झाली आहे. तसे पहायला गेल्यास हे दोन्ही तालुके अनेक वर्षे काँग्रेसचे बालेकिल्ले राहिले आहेत. तथापि यल्लापूर – मुंदगोड विधानसभा मतदार संघातून काँग्रेसला राम राम बोलून शिवराम हेब्बार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पुढे ते पोटनिवडणुकीत निवडून आले आणि पाठोपाठ मंत्रीही झाले आहेत. हेब्बार आणि त्यांच्या समर्थकांच्या भाजप प्रवेशामुळे यल्लापूर आणि मुंदगोड तालुक्यात काँग्रेसचा प्रभावी नेता उरलेला नाही. आणि म्हणूनच या दोन तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुकीची जबाबदारी काँग्रेसने कलघटगीचे माजी आमदार संतोष लाड यांच्या खांद्यावर सोपविली आहे. त्यामुळे लाड मंत्री हेब्बार यांच्याशी कशी झुंज देणार याकडे सर्वांची नजर लागून राहिली आहे. शिवराम हेब्बार अतिशय बलाढय़ बनून राहिल्याने त्यांना आवर घालणे लाड यांना आता कितपत झेपेल याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. आणि म्हणूनच लाड यांच्या मदतीला आर. व्ही. देशपांडे आणि त्यांचे पुत्र प्रशांत देशपांडे धावून आले आहेत. दरम्यान यल्लापूर, मुंदगोड विधानसभा मातदार संघातून प्रशांत देशपांडे निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगितले जाते. आणि म्हणूनच या दोन तालुक्यातील ग्रा. पं. निवडणुकीद्वारे लाडसह देशपांडे पितपुत्रांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
शिरसी- सिद्धापूर तालुक्यात भाजप बलशाली
शिरसी आणि सिद्धापूर तालुक्यातील ग्रा. पं. ची एकूण संख्या 54 इतकी आहे. या दोन्ही तालुक्यातही भाजप विरोधक काँग्रेस अशा स्वरुपाचाच सामना रंगला आहे. शिरसी सिद्धापूर मतदार संघावर गेल्या काही वर्षापासून विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांचे वर्चस्व आहे. त्याचबरोबर कारवारचे खासदार अनंतकुमार हेगडे यांचे वास्तव्य शिरसी येथेच आहे. विश्वेश्वर हेगडे निवडणूक प्रचारापासून अलिप्त आहेत. खासदार हेगडे यांचाही निवडणूक प्रचारातील सहभाग ना च्या बरोबर आहे. तरीसुद्धा भाजपचे दुसऱया फळीतील नेते आणि अनेक कार्यकर्ते या दोन्ही तालुक्यात जास्तीत जास्त ग्रा. पं. च्या जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष भोमण्णा नाईक आणि अन्य नेतेही सक्रायपणे कामाला लागले आहेत. काम कठीण आहे पण अशक्य नाही. शेवटी काँग्रेस की भाजप बाजी मारणार, हे येणारा काळ ठरविणार आहे..