महेश कोनेकर/ मडगाव
कृषी क्षेत्रात पारंपारिक पद्धत कायम ठेवतानाच तिला आधुनिकेतची किनार देत आपल्या बागायतीत नवीन प्रयोग यशस्वी करण्यात पिर्ला-केपे येथील विठ्ठल खांडेपारकर हे यशस्वी ठरले आहेत. बागायतीतून चांगले उत्पन्न मिळावे यासाठी आज अनेक शेतकरी रासायनिक खताचा वापर करतात. रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीची सुपिकता नष्ट होत असते. जर जमिनीची सुपिकता कायम ठेवायची असेल तर केवळ सेंद्रीय खतावरच भर द्यावा लागेल असा संदेश श्री. खांडेपारकर आपल्या कृतीतूनच इतरांना देत असतात.
केपे तालुक्यातील पिर्ला या गावात विठ्ठल खांडेपारकर यांनी आपली बागायती विकसित केली आहे. सुरवातीला श्री. खांडेपारकर हे ऊस शेती करायचे. परंतु, गोव्यातील एकमेव संजीवनी साखर कारखाना बंद झाल्याने, त्यांनी पर्यायी उत्पादनावर भर दिला व सुपारीची लागवड केली. सुपारीची लागवड करताना त्यांनी कर्नाटकातील ‘सिरसी’ सुपारीच्या लागवडीवर भर दिलाय. ‘सिरसी सुपारी’ला गोव्याचे हवामान पोषक आहे. त्याच बरोबर लागवडीनंतर तीन-चार वर्षात उत्पन्न मिळत असते. श्री. खांडेपारकर हे वर्षाला सुमारे 7000 किलो सुपारीचे उत्पन्न घेत असतात. हे उत्पन्न वाढवून दहा हजार किलो पर्यंत नेण्याचा आपला प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली.
सुपारीच्या झाडावरच त्यांनी ‘मिरी’ची लागवड केलीय व सुपारी बरोबर मिरीचे पीक ते घेत असतात. वर्षाला सुमारे 500 किलो मिरी त्यांना मिळत आहे. मिरीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नरत आहे. स्वता मिरीची कलमे तयार करतात व त्यांची लागवड करतात हे त्यांचे वैशिष्ठय़ आहे. सुपारी व मिरीच्या लागवडी संदर्भात ते चौकस आहे. उत्पादन कसे वाढवावे याची माहिती कुणाकडून मिळत असेल तर ती त्वरित आत्मसात करून स्वता प्रयोग करण्यात ते कधीच मागे राहिलेले नाहीत. ‘सिरसी’ येथील हेगडे यांच्याकडून त्यांनी बरीच माहिती प्राप्त करून त्या प्रमाणे बागायतीची लागवड करण्यावर भर दिलेला आहे. बागायतीत नारळाचे उत्पादन देखील ते घेत आहेत. नारळ मात्र, स्थानिक गोव्यातील असून वर्षाला त्यांना सुमारे 25000 नारळ मिळतात.
हळद, भेंडी, मिरची, कॉफी, चिटकी-मिटकीची लागवड
विठ्ठल खांडेपारकर आपल्या बागायतीत हळदीचे उत्पादन घेत आहे. हळदीचे उत्पन्न ही बऱयापैकी मिळत असून हळदीवर प्रक्रिया करून तेच स्वता पावडर करून त्यांची विक्री करतात. हळदी प्रमाणेच कॉफीचे उत्पादन ते घेतात. कॉफीवर प्रक्रिया करून त्याची ही विक्री करतात. ऊसाला मागणी नसल्याने, त्यांनी ऊसाच्या मळात भेंडी, मिरची तसेच चिटकी-मिटकी लागवड केली आहे. भेंडी, मिरची व चिटकी-मिटकी ते गोवा फलोत्पादन मंडळाला पुरवित असतात.
त्यांचे ऊस उत्पादन हे 50 टन होते. परंतु, संजीवनी साखर कारखाना बंद झाल्याने, ऊसाचे काय करायचे असा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला होता. पेपे व सांगे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱयांनी संजीवनी साखर कारखाना बंद झाल्यानंतर अनेक समस्यांचा सामना केलेला आहे. श्री. खांडेपारकर यांनी तर कोवळा ऊस कापून आपल्या गुरांनाच खाद्य म्हणून वापरात आणतात. थोडय़ा ऊसाचा ते गुळासाठी वापर करतात. ते स्वता गुळ तयार करून नातेवाईकांना व मित्र परिवाराला पुरवित असतात.
सेंद्रीय खतावरच भर
श्री. खांडेपारकर यांनी आपल्या बागायतीत ‘ग्रीन हार्वेस्ट’ या खताबरोबरच शेण खताचा वापर करतात. त्यासाठी त्यांनी गुरांचे पालन केले आहे. त्यात गुजरातच्या ‘गिर’ गायीचा देखील समावेश आहे. सेंद्रीय खतामुळे जमिनीची सुपिकता वाढते. बागायतीत बऱयापैकी उत्पन्न मिळते हा त्यांचा अनुभव आहे.
बागायतीतून जी आर्थिक प्राप्ती होत असते, त्यातील 35 ते 40 टक्के खर्च पुन्हा बागायतीवरच करणे आवश्यक असते. त्यात पाणी, वीज, खत व कामगार वर्ग इत्यांदीचा समावेश असतो. जेव्हढी मेहनत बागायतीवर घेतली जाते, तेव्हढेच उत्पन्न बऱयापैकी मिळत असते हा विठ्ठल खांडेपारकर यांचा आत्मविश्वास आहे.
श्री. खांडेपारकर यांना राज्य सरकारच्या कृषी खात्याचा ‘कृषी विभूषण’ हा पुरस्कार 2016-2017 साली प्राप्त झाला होता. कृषी क्षेत्रातील रोल मॉडेल म्हणून त्यांना गौरविण्यात आले होते.