प्रतिनिधी/ सातारा
पाटण पंचायत समितीमध्ये शेतकऱयांसाठी आलेले बियाणे किती आहे याची माहिती जिल्हा परिषद सदस्यांना दिली जात नाही. त्याबाबत अवगत करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य बापूराव जाधव यांनी करताच जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी मी कृषी समितीच्या सभेत सक्त सुचना दिल्या आहेत, माहिती दिली गेली पाहिजे, असे म्हणून दोघांमध्ये काही काळ शाब्दीक झाली. दरम्यान, कृषी विभागासाठी वाढीव निधी मिळावा अशी काही सदस्यांनी मागणी केली. तर जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट यांनी नेमका किती कोव्हिड 19 साठी निधी आला आणि किती खर्च झाला अशी मुद्दा मांडला त्यावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी यावर आपण पुन्हा बसू असे उत्तर दिले. दरम्यान, शाळा दुरुस्तीच्या मुद्यावर सातारा पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर यांनी लक्ष वेधले. प्रतापसिंह हायस्कूल रयत शिक्षण संस्थेला चालवण्यास देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा कोव्हिड 19 मुळे व्हीसीद्वारे घेण्यात आली. सभेला उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण सभापती सोनल पोळ, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अविनाश फडतरे यांच्यासह मान्यर उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला प्रत्येक पंचायत समितीत कोण कोण सदस्य हजर आहे ते पाहिले अन् नंतर शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी अभिनंदनाचे व दुखवटय़ाचे ठराव मांडत सभेला प्रारंभ झाला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी विषय वाचन केले. अर्चना देशमूख यांनीही अभिनंदनाचा ठराव मांडला. मधु कांबळे यांनी सातारा पंचायत समितीत एलसीडीची सोय नाही, कॅमेरा नाही, अशी खंत व्यक्त केली. लगेच सोय करण्यात आली. भीमराव पाटील म्हणाले, दुष्काळी अनुदान वाटले गेले का, असा सवाल उपस्थित केला. तर उदय कबुले यांनी 15 लाख तरतूद केली होती. त्यामदये आता 35 लाखाच्या निधीला मंजूरी देण्यात येत आहे. 15 दिवसात जमा होईल, असे सांगितले. तर मानसिंगराव जगदाळे यांनी 2017 18 चे जमा झाल्याचे सांगितले. संजीवराजे यांनी मागच्या सभेत प्रतापसिंह हायस्कूलचा विषय गैरसमजुतीने स्थगित करण्यात आला होता. आता तो मंजुर करण्यात यावा रयतकडे चालवण्यास देण्याचा ठराव मंजूर करण्यात यावा, अशी मागणी केली. सर्वानी त्यास मंजूरी दिली.अर्चना देशमुख चर्चा करुन निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
कृषी विभाग धारेवर
सुरेंद्र गुदगे म्हणाले, कृषी विभागासाठी 33 टक्के देतोय खरे पण एवढा वाढवून देताना पशुसंवर्धनचा विचार व्हावा, अशी मागणी केली. त्यावर कृषी सभापती मंगेश धुमाळ म्हणाले, 1 कोटी 13 लाख एवढी मागणी होते आता औषधासाठी म्हणून आपण ज्यादाच तरतूद करत आहोत. जिल्हाधिकाऱयांकडे प्रस्ताव पाठवत आहोत, असे सांगितले. त्यावर बापूसाहेब जाधव म्हणाले, पाटण पंचायत समिती भात आणि सोयाबीन बियाणांची किती बॅग आली त्याची माहिती मिळाली नाही, जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात न घेता वाटप केले जाते.आम्ही जिल्हा परिषद सदस्य आहोत असा आरोप केला. त्यावर मंगेश धुमाळ म्हणाले, मासिक मिटिंग झाली तेव्हा सक्त सूचना दिल्या होत्या.विश्वास घेऊन वाटप करावे अशी कडक सूचना दिल्या आहेत असे सांगितले. विजय पवार यांनी कारवाईची मागणी केली.
आरोग्य विभागाच्याही त्रुटी सदस्यांनी मांडला
कोव्हिडचा आढावा घेण्याअगोदरच धैर्यशील अनपट यांनी नेमका निधी किती आला आणि खर्च किती झाला असा सवाल केला. त्यावर प्रदीप विधाते यांनी ऐनवेळच्या विषयात उत्तर देतो असे सांगून टाळले. पुढे भारती पोळ यांनी आर्सेनिक अल्बमच्या गोळय़ा गावोगावी कमी पडत आहेत. र्थमल स्कन मशिन खरेदी करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला द्यावेत, अशी मागणी केली. विजय पवार यांनी जिल्हा परिषदेचे आशा वर्कर, अंगणवाडी सेविका या ग्रास रुटला काम करत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना पीपीई कीट देण्यात यावेत, अशी मागणी करताच प्रदीप विधाते यांनी ते देता येत नाही. खर्चीक आहेत, असे सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी आढावा मांडला.
दिव्यांग पुन्हा तीन चाकी वाहनांपासून राहणार वंचित
तब्बल दोन वर्षांनंतर घेण्यात आलेला तीन चाकी वाहन देण्याचा ठराव सभेपुढे आला परंतु सभेमध्ये संजीवराजे यांनी 80 टक्के अपंगत्व असावे, अशी मागणी केली. भीमराव पाटील यांनी 50 टक्के करा, असे सांगितले. शाळा दुरुस्ती वरून उदयसिंह पाटील यांनी व सभापती सरिता इंदलकर यांनी मुद्दा उपस्थित केला.