डॉक्टरांचे मनोधैर्य वाढविण्याची गरज
प्रतिनिधी/ बेळगाव
कोविड-19 च्या लढाईमध्ये आघाडीवर असणाऱया डॉक्टरांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सर्वत्र कौतुक, मानसन्मान होत असला तरी प्रत्यक्षात आता कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱया डॉक्टरांचे आणि आरोग्य सेवकांचे मनोबल डळमळीत होऊ लागले आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधीलच डॉक्टर गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहेत. सिव्हिलमध्ये डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे पुन: पुन्हा त्याच डॉक्टरांना कोरोना वॉर्डमध्ये सेवा करावी लागत आहे. तथापि, कामातील धोके लक्षात घेतले असता त्या अनुरूप सवलती, सुविधा कमी असल्याने आता डॉक्टरसुद्धा वैतागून गेले आहेत.
सरकारी सेवेत असल्यामुळे त्यांना स्पष्टपणे आपल्या अडचणी मांडता येत नाहीत. नोकरी सोडता येत नाही आणि नोकरीतील धोके मात्र वाढत आहेत. अशा दुहेरी कोंडीत हे डॉक्टर सापडले आहेत. बिम्समध्ये श्वासकोष विभागात काम करणाऱया डॉक्टरांनाच पुन: पुन्हा या वॉर्डमध्ये काम करावे लागत आहे. यापूर्वी या डॉक्टरांना मिलन हॉटेल येथे क्वारंटाईनसाठी ठेवण्यात येत होते. तेथे त्यांच्या भोजनाचीही सोय केली जात होती.
आता मात्र कोरोना वॉर्डमध्ये सेवा केल्यानंतर या डॉक्टरांना घरातच क्वारंटाईन रहावे लागते. हे डॉक्टर बाधितांच्या संपर्कात अधिक वेळ येत असल्याने त्यांच्या आरोग्याची आणि आपल्याही आरोग्याची त्यांच्या कुटुंबीयांना काळजी आणि चिंता भेडसावत आहे. आयएमए संघटनेने फ्लू क्लिनिकसाठी मदत केली आहे. परंतु प्रत्यक्षात सिव्हिल हॉस्पिटल आणि बिम्सचे डॉक्टर वगळता कोणीही डॉक्टर या ठिकाणी काम करण्यास तयार नाहीत. वास्तविक सरकारने डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी आयएमए किंवा खासगी हॉस्पिटल तसेच दवाखान्याच्या डॉक्टरांची मदत घ्या, असे आवाहन केले होते. परंतु प्रत्यक्षात या आवाहनाला कोणत्याच खासगी डॉक्टरांनी प्रतिसाद दिलेला नाही, अशा कुटुंबीयांच्या तक्रारी आहेत. मात्र आयएमएने त्याचा इन्कार केला आहे.
आयएमएचे किंवा खासगी सेवा बजाविणारे हे डॉक्टर 60 वर्षांच्या आतील आहेत. मधुमेह, रक्तदाब अशा कोणत्याही आजाराने ते त्रस्त नाहीत, अशा डॉक्टरांना कोविड-19 वॉर्डमध्ये काम करता येऊ शकते. आयसीएमआरने दिलेल्या प्रणालीनुसार ईएनटी किंवा एमबीबीएस पदवी घेतलेल्या डॉक्टरांना कोरोना रुग्णांवर उपचार करता येऊ शकतात. आयएमईआरने उपचार प्रणालीसुद्धा ठरवून दिलेली आहे. त्यामुळे बाहेरील डॉक्टरांनी येथे सेवा बजाविण्यास पुढे येण्याची गरज आहे.
डॉक्टरांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली
दरम्यान, कोविड-19 वॉर्डमध्ये काम केलेल्या डॉक्टरांना आणि आरोग्य सेवकांना मिलन हॉटेलमध्ये क्वारंटाईनसाठी ठेवण्यात येत होते. आता बहुधा निधीअभावी सरकारने ती सवलत काढून घेतली आहे. त्यांच्या भोजनाची सुविधाही आता उपलब्ध नाही. पूर्वीसुद्धा या डॉक्टरांना विविध गरजांसाठी स्वतःच्या खिशातून पैसे मोजावे लागले आहेत. आता क्वारंटाईन काळात घरीच रहा, असे त्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. घरातल्या घरातच त्यांना प्लास्टिक डब्यातून भोजन देणे, त्यांना पूर्णतः कुटुंबीयांपासून अलग करून वागविणे हे कुटुंबीयांना जड जात आहे.
या सर्व परिस्थितीचा डॉक्टरांवरही विलक्षण ताण आलेला आहे. वास्तविक सध्या सरकारने अन्य कोणत्याही घटकांपेक्षा डॉक्टरांवर लक्ष केंद्रित करणे, त्यांच्या अडचणी सोडविणे आणि त्यांचे नैतिक बळ वाढविणे आवश्यक आहे. परंतु सरकारने असलेल्या सवलती कमी केल्या आहेत आणि एका अर्थाने तुमची काळजी तुम्हीच घ्या, असे सुचित केले आहे. शहरातील डॉक्टरांची संख्या लक्षात घेता किमान काही डॉक्टरांची नेमणूक सध्या सरकारने करावी आणि कोरोना वॉर्डमधील डॉक्टरांची काही दिवसांसाठी सुटका करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
रोटेशन पद्धतीने काम सोपविले जावे
कोणतेही डॉक्टर याबद्दल स्पष्ट बोलू शकत नाहीत. परंतु त्यांचे कुटुंबीय मात्र ही परिस्थिती पाहून चिंताक्रांत झाले आहेत. आता कोरोनाची पूर्वीइतकी धास्ती राहिली नाही. रुग्णांचा आकडा वाढत असला तरी रोगमुक्त होणाऱयांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे त्याच डॉक्टरांवर सतत त्याच वॉर्डमध्ये काम करण्याचे बंधन घालण्याऐवजी रोटेशन पद्धतीने काम सोपविले जावे, असे डॉक्टरांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
अडचणी सोडविण्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे
रुग्णांची संख्या वाढत असल्याने हॉस्पिटलच्या कोविड-19 च्या वॉर्डमध्येही गर्दी होत आहे. सामाजिक अंतर राखणे कठीण होत असून काही रुग्ण निर्धास्तपणे इतरत्र फिरत आहेत. हॉस्पिटलमध्ये मिळणाऱया जेवणाबद्दल दररोज तक्रारी वाढत आहेत. यातच भर म्हणून की काय आता वाहतूक बंद असल्याने जे आरोग्य सेवक आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी हॉस्पिटलच्या हॉस्टेलमध्ये राहत होते, त्यांना आता हॉस्टेल सोडण्यासाठी दबाव आणला जात आहे. या सर्व परिस्थितीमुळे डॉक्टर, आरोग्य सेवक पूर्णतः वैतागले आहेत. त्यांचे मनोधैर्य आणि मनोबल टिकविण्यासाठी शासनाने त्वरित त्यांच्या अडचणी सोडविण्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
सरकारच्या नियमांचे पालन करणे आमच्या हातात
डॉ. विनय दास्तीकोप-वैद्यकीय संचालक बिम्स
कोविड-19 चे संकट इतके गंभीर रूप धारण करेल, याची कोणालाही कल्पना नक्हती. परंतु एकदा आपण ज्या ठिकाणी काम करतो तेथील नियम पाळून नोकरी करणे हे प्रत्येकासाठीच बंधनकारक असते. आयएमएच्या डॉक्टरांनीसुद्धा कोविड-19 वॉर्डमध्ये येऊन काम केले आहे. त्याची येथील डॉक्टरांना कदाचित कल्पना नसावी. नोकरीमध्ये सरकारचे किंवा संस्थेचे नियम पाळावे लागतात. परंतु बाहेरील डॉक्टर कोविड-19 वॉर्डमध्ये काम करत नाहीत, या तक्रारीमध्ये तथ्य नाही. क्वारंटाईनबाबत सरकारनेच नियम बदलले आहेत. एखाद्यामध्ये कोविडची लक्षणे आढळली तर हॉस्पिटलमध्ये दाखल होणे आवश्यक आहे. अन्यथा आता घरीच क्वारंटाईन रहावे, हा सरकारचा नियम आहे. त्याचे फक्त पालन करणे आमच्या हातात आहे. दुसरे म्हणजे लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्याने आणि वाहतूक सुरळीत झाल्याने कर्मचाऱयांना वसतिगृह सोडण्यास सांगण्यात आले आहे. हॉस्पिटलमध्ये कोविड वॉर्डमध्ये 200 खाट आहेत. सध्या तेथे 137 रुग्ण असून 170 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.