उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची स्पष्टोक्ती,
प्रतिनिधी/ सातारा
ज्यांची रोजंदारीवर पोट चालत. काम केल्यावर ज्यांची चुल पेटते. त्यांना मोफत धान्य दिले आहे. अजूनही धान्य देण्याची आमची तयारी आहे. काहीही झालं तरीही महाराष्ट्राला कोरोनाच्या या संकटातून बाहेर काढायचे आहे. हे करत असताना अन्य व्याप नाही म्हणून काही तरी अघटित घडत आहे. अशी वेळ येवू द्यायची नाही, याची खरबदारी राज्य सरकार घेत आहे, अशी स्पष्टोक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली. दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात सोमवारपासून कोव्हीड तपासणी सेंटर सुरु करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहायलाचे रखडलेले काम मार्गी लागणार आहे. मेडिकल कॉलेजचा प्रश्न सोडवण्यासाठी गुरुवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आयोजित आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अजितदादा पवार म्हणाले, वेगवेगळय़ा विकास कामांचा आढावा घेण्यात आला. कोरोना संदर्भातला आढावा घेतला. मी राज्य सरकारच्यावतीने सांगू इच्छितो की हा आढावा घेत असताना कुठल्याही प्रकारची कमतरता राज्यात भासू देणार नाही. अशा प्रकारची खबरदारी मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही घेतोय. तसेच हे सगळे करत असताना आपण कोरोनाच्या संदर्भात साताऱयात जिल्हा रुग्णालयात कोव्हिड 19 चे चाचणी सेंटर सुरु करतोय. तशा आरोग्य विभागाच्या सचिवांना सूचना केल्या आहेत. सोमवारपर्यंत ते सेंटर सुरु होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
एसटी आगाराचे बांधकाम प्रस्तावित
त्याच बरोबर काही सार्वजनिक प्रश्नाबद्दल चर्चा झाल्याचे सांगत ते म्हणाले, विशेषत वाई, खंडाळा, महाबळेश्वर एसटी डेपोच्या बांधकामाबाबत चर्चा झाली. एमएसआरडीसीमध्ये कोरोनामुळे सध्या पगार मिळणे देखील अडचणीचे होतेय. आमचे मंत्री अनिल परब हे काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. ही सगळी कामे करायची असतील तर निधी द्यावा लागणार आहे. निधीची थोडीसी कमरता आहे. हळूहळू परिस्थिती पूर्ववत येईल. मध्ये जसे बंदी होती. आता काहीसे सुरु झाले आहे. काही प्रमाणात रेल्वे सुरु झाल्या आहेत. विमाने काही प्रमाणात सुरु झाली आहेत. हळूहळू केंद्र सरकार बऱयाच अटी शिथील करण्याचा प्रयत्न करत आहे. परवाच कॅबिनेटला मुख्यमंत्र्यांनी सांगितले की एअरकंडिशनल सलुन सुरु करावे. इतर बाबतीमध्येही रोजंदारीवर ज्यांची पोट आहेत. काम केल्यावर ज्यांची चुल पेटते. मोफत धान्य दिले अजूनही धान्य देण्याची आमची तयारी आहे. काहीही झाल तरीही महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढायचे. काढत असताना अन्य व्याप नाही म्हणून काही तरी अघटित घडत आहे. अशी वेळ येवू द्यायची नाही. अशी खरबदारी राज्य सरकार घेत आहे.