पंचगंगा नदी धोक्याकडे : शिरोळ, करवीरमध्ये एनडीआरएफची पथके दाखल नदीकाठच्या गावातील नागरिक, जनावरांचे स्थलांतर
प्रतिनिधी / कोल्हापूर
दोन दिवसांपासून मुसळधार मुसळधार पाऊस होत आहे. संततधार पावसामुळे जिल्हय़ातील सर्वच नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीने दुपारी 2 वाजताच 39 फूट ही इशारा पातळी पार करत धोक्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. रात्री 7 वाजता पाणीपातळी 41 फूट होती. मध्यरात्रीपर्यंत धोकापातळी ओलांडण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नदीकाठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान चिखली, आंबेवाडीसह पंचगंगा, कृष्णा, वारणा नदीकाठावरील महापुराचा धोका असलेल्या गावांमध्ये एनडीआरएफच्या तुकडय़ा तैनात असून मदतकार्यही सुरू केले आहे. येथील नागरिक, जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.
दरम्यान, वारणा, चांदोली धरणक्षेत्रात ढगफुटीसदृष्य पाऊस सुरू असल्याने धरणातून रात्री 8 पासून 22 हजार क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील वारणा, कृष्णा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
24 तासांत 12 फुटांनी पाणी वाढले
गत 24 तासांत पंचगंगा नदीची तब्बल 12 फुटांनी पाणीपातळी वाढली आहे. गुरुवारी दुपारी 2 नंतर नदीने इशारा पातळीच्या दिशेने कूच केली. रात्री 8 पर्यंत धोका पातळीही ओलांडेल, अशी शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे. जिहय़ातील अनेक मार्ग बंद झाले असून काही गावांसाठी पर्यायी मार्गाने व्यवस्था केली आहे. रस्त्यावर पाणी आल्याने काही गावांचा संपर्कही तुटत असून शाहुवाडी तालुक्यातील सर्वाधिक गावांचा संपर्क तुटला आहे.
आंबेवाडी व चिखलीत स्थलांतर
पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठल्याने सुरक्षितेच्या कारणास्तव 25 जवानांचे पथक करवीर तालुक्यातील आंबेवाडी व चिखली या ठिकाणी दाखल झाले आहे. या ठिकाणी करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शितल मुळे यांनी पाहणी केली. बाजार भोगाव (ता. पन्हाळा) येथे आजारी व वयस्कर नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 5 जणांचे पथक दाखल झाले आहे. कळे (ता. पन्हाळा) येथे रस्ता बंद झाल्याने दक्षता म्हणून या ठिकाणी 5 जणांचे पथक, करंजफेण (ता. शाहुवाडी) येथे संपर्क तुटल्याने 25 लोकांना बाहेर काढण्यासाठी 17 जणांचे पथक, वाघवे (ता. पन्हाळा) येथे माकडे अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी 8 जणांचे पथक, म्हाकवे (ता. कागल) येथे रस्ता बंद झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव 9 जणांचे पथक दाखल झाले आहे. आवश्यक त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनच्या जवानांकडून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.