प्रस्ताव तयार : मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर चालना
प्रतिनिधी/ बेंगळूर
प्रशासनातील खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने काही खात्यांचे विलिनीकरण् ा करण्याचा निर्णय घेतला होता. याचाच एक भाग म्हणून तीन खात्यांचे विलिनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
राज्य सरकारने कोणकोणती खाती विलिन करता येतील, याबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमली होती. महसूलमंत्री आर. अशोक यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने अहवाल तयार केला होता. या अहवालातील शिफारसींनुसार तीन खात्याचे विलिनीकरण केले जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर या प्रक्रियेला अधिक चालना मिळणार आहे.
कन्नड आणि सांस्कृतिक खाते, क्रीडा आणि युवजन सेवा खाते आणि पर्यटन खात्यांचे विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सध्या या तिन्ही खात्यांचे मंत्री चिक्कमंगळूरचे आमदार सी. टी. रवी हे आहेत. या तिन्ही खात्यांचे काम समान पद्धतीचे आहे. खात्यांच्या विलिनीकरण प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे, अशी माहिती सी. टी. रवी यांनी दिली आहे.