मुंबई इंडियन्सची बाजू किंचित वरचढ, कॅपिटल्सच्या फलंदाजांची कसोटी लागणार
वृत्तसंस्था/ अबु धाबी
आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत सातत्यपूर्ण प्रदर्शन केलेल्या मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स या दोन तुल्यबळ संघांत मुकाबला होणार आहे. त्यात दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये छोटे छोटे द्वंद्व पहावयास मिळण्याची अपेक्षा केली जात आहे. सायंकाळी 7.30 पासून ही लढत सुरू होईल.
आघाडी फळी, मध्यफळीतील फलंदाजांची कामगिरी असो अथवा घातक गोलंदाजी असो, या तिन्ही बाबतीत दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. फक्त एका बाबतीत मुंबई इंडियन्सची बाजू थोडीशी वरचढ आहे ती म्हणजे अनुभवी वेगवान गोलंदाजी. जसप्रित बुमराह व दीर्घ अनुभव असलेला ट्रेंट बोल्ट या लढतीच्या निकालातील मुख्य फरक ठरू शकतात. याचाच अर्थ असा की शिखर धवनला कॅपिटल्सला चांगली सुरुवात करून देण्यासाठी झगडावे लागणार आहे. त्याने काही सामन्यात चांगली सुरुवात केली आहे, पण त्याला त्याचे मोठय़ा खेळीत रूपांतर करता आलेले नाही. त्यामुळे या महत्त्वाच्या सामन्यात त्याने मोठी खेळी केली तर ते संघाच्या पथ्यावर पडणार आहे. युवा खेळाडू पृथ्वी शॉ व रिषभ पंत यांचीही या सामन्यात बुमराह-बोल्टसमोर खरी कसोटी लागणार आहे.
कॅपिटल्ससाठी चांगली बातमी म्हणजे हेतमेयरला गवसलेला सूर. शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याने जोरदार फटकेबाजी केली होती. आतापर्यंत या संघाचा हेतमेयर हाच एकमेव कच्चा दुवा होता. पण त्याने राजस्थानविरुद्ध षटकारांची आतषबाजी करीत केलेल्या खेळीमुळे त्यांची ही चिंताही दूर झाली आहे. कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने फलंदाज आणि कर्णधार म्हणून प्रभावी प्रदर्शन केले आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा तसेच मध्यफळीतील हार्दिक पंडय़ा व पोलार्ड यांना रोखण्यासाठी गोलंदाजांचा तो कसा वापर करतो ते पाहणे मनोरंजक ठरेल. हे सर्वच फलंदाज कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देऊ शकतील, अशी त्यांची कुवत आहे. त्यांना अय्यर कसा हाताळतो ते महत्त्वाचे ठरणार आहे.
कृणाल पंडय़ानेही झटपट फटकेबाजी करून मुंबईला सुस्थिती प्राप्त करून दिलेली आहे. अय्यरकडे रबाडा व ऍन्रिच नॉर्त्जे हे दोन द.आफ्रिकन जलद गोलंदाज असल्याने मुंबईच्या फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी प्रामुख्याने त्यांच्यावरच असणार आहे. याशिवाय आर.अश्विनच्या फिरकीने कॅपिटल्सच्या आक्रमणाला धार आली आहे तर अमित मिश्राच्या जागी स्थान मिळालेल्या अक्षर पटेलनेही आपले स्थान भक्कम केले आहे. याशिवाय तो फलंदाजीतही योगदान देत असल्याने कॅपिटल्ससाठी ही जमेची बाजू असेल. अबु धाबीमध्ये 170 च्या आसपासची धावसंख्या इतर कोणत्याही संघांविरुद्ध पुरेशी ठरू शकते. पण मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्याविरुद्ध दोनशे धावाही सुरक्षित वाटणार नाहीत, अशी स्थिती आहे.
संघ : मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, लीन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पंडय़ा, इशान किशन, पॅटिन्सन, बुमराह, जयंत यादव, पोलार्ड, कृणाल पंडय़ा, मॅक्लेनाघन, मोहसिन खान, कोल्टर नाईल, प्रिन्स बलवंत राय, डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, बोल्ट.
दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), आर.अश्विन, धवन, शॉ, हेतमेयर, रबाडा, रहाणे, अमित मिश्रा, पंत, इशांत, अक्षर पटेल, संदीप लामिछने, कीमो पॉल, डॅनियल सॅम्स, मोहित शर्मा, नॉर्त्जे, ऍलेक्स कॅरे, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, स्टोईनिस, ललित यादव.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.