तहरीक-ए-लब्बैकशी संघर्षात 3 पोलिसांचा मृत्यू- कंटेनर्सद्वारे रस्ते केले बंद- खड्डे खणून ठेवले
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानात सरकार आणि प्रतिबंधित संघटना तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) यांच्यातील संघर्ष वाढला आहे. फ्रान्सच्या राजदूताला देशातून हाकलण्यासमवेत 4 मागण्यांवरून टीएलपीने इस्लामाबाद मार्च (शहराच्या दिशेने कूच) सुरू केला आहे. यादरम्यान झालेल्या हिंसक झटापटीत 3 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. इम्रान खान सरकारने 3 अटी मान्य केल्या आहेत, पण फ्रान्सच्या राजदूताला देशातून बाहेर काढण्याची त्यांची तयारी नाही, तर टीएलपीची मुख्य मागणी हीच आहे.
मार्च रोखण्यासाठी सरकारने रस्त्यांवर कंटेनर्स उभे केले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठमोठे खड्डे खणले गेले आहेत, जेणेकरून टीएलपीच्या वाहनांना तेथून जाता येणार नाही. पण मार्चमध्ये सामील बहुतांश लोक पायीच निघाले आहेत.
एका मागणीवरून संघर्ष
धर्माच्या अवमानाप्रकरणी फ्रान्सच्या राजदूताला देशातून हाकलले जावे असे टीएलपीचे म्हणणे आहे. तर हे पाऊल उचलल्यास देशाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे सरकारचे सांगणे आहे. युरोपीय दश पाकिस्तानच्या विरोधात जातील, जीएसपी प्लस दर्जा संपुष्टात येईल आणि पाकिस्तानींना युरोपमध्ये जाणे अवघड ठरेल असे सरकार सांगत आहे. तर दुसरीकडे टीएलपी भूमिका मवाळ करण्यास तयार नाही. 6 महिन्यांपासून तुरुंगात कैद टीएलपी प्रमुख साद रिजवीची मुक्तता करण्यास तयार आहोत, टीएलपीवरील बंदीही हटवू तसेच अन्य लोकांचीही मुक्तता करू असे सरकार म्हणत आहे.
सरकार धोक्यात
टीएलपीचे पाकिस्तानात लाखो समर्थक आहेत. सुमारे 20 हजार समर्थक इस्लामाबाद मार्चमध्ये सामील होत आहेत. सरकारने त्यांच्याविरोधात बळाचा वापर केल्यास हिंसाचार भडकू शकतो. लाहोरमध्ये काही दिवसांपूर्वी अशाच हिंसाचारात अनेक पोलीस कर्मचारी मारले गेले होते. रावळपिंडी आणि इस्लामाबादमधील अंतर केवळ 28 किलोमीटर आहे. टीएलपीचे समर्थक इस्लामाबादमध्ये पोहोचल्यास सरकारसमोर अनेक अडचणी उभ्या ठाकणार आहेत. हा विषय शांततेत सोडवू असे गृहमंत्री शेख रशीद म्हणत आहेत. तर रशीद यांच्या विधानामुळेच हा विषय चिघळत असल्याचा टीएलपीचा आरोप आहे.
सैन्याच्या भूमिकेबद्दल संशय
टीएलपीचे कार्यकर्ते मुरीदके कॅम्पपर्यंत पोहोचले आहेत. तेथून इस्लामाबाद केवळ 14 किलोमीटर अंतरावर आहे. टीएलपीला सैन्याचे समर्थन प्राप्त आहे आणि सैन्य इम्रान यांना पंतप्रधान पदावरून हटवू इच्छित असल्याचे काही जाणकारांचे मानणे आहे. आयएसआय प्रमुखाच्या नियुक्तीप्रकरणी इम्रान आणि सैन्य यांच्यातील गंभीर मतभेद जगजाहीर झाले होते.
पुढे काय घडणार?
टीएलपीचे कार्यकर्ते इस्लामाबादमध्ये पोहोचल्यास तेथील कायदा-सुव्यवस्था धोक्यात येण्यासह अन्य गोष्टीही ठप्प होऊ शकतात. कारण काही तासांमध्ये लाखो लोक तेथे पोहोचतील. लाहोरमध्ये 6 महिन्यांपूर्वी अशाच प्रकारची स्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानात बुधवार रात्रीपासून गुरुवारपर्यंत स्थिती अत्यंत धोकादायक होणार असल्याची चिन्हे आहेत.