त्रास देण्यासाठी खोटय़ा गुन्हय़ात गोवण्याचा प्रकार
प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचा अवमान झाल्यानंतर बेळगावात धर्मवीर संभाजी चौक येथे निषेध करण्यात आला. त्यावेळी दगडफेक केली म्हणून खोटे गुन्हे मराठी भाषिक युवकांवर घालण्यात आले. त्यानंतर राजद्रोहासारखा 124(अ) हा गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. नाहक त्रास देण्यासाठी सरकार आणि येथील प्रशासनाने गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विटंबना करण्यात आली. ही बाब गंभीर आहे. या ठिकाणी काही कन्नड संघटनांचे पदाधिकारीदेखील उग्र आंदोलन करत असतात. मराठी भाषिकांना लक्ष्य बनवितात. त्यावेळी मात्र अशा प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर दाखल केले जात नाहीत. पोलिसांनी 38 मराठी भाषिकांना अटक करून कारागृहात घातले आहे. तर आणखी 23 हून अधिक जणांवर गुन्हे आहेत.
खडेबाजार, कॅम्प, टिळकवाडी, मार्केट पोलीस स्थानकामध्ये गुन्हे नोंदवून अडकविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामध्ये राजकीय शक्ती पणाला लावल्याचेही बोलले जात आहे. जामीनसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र आता जामीन पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्मयता आहे. मुख्य जिल्हासत्र न्यायालयाकडे आता अर्ज करावा लागणार आहे. या खटल्यात ऍड. महेश बिर्जे, ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. एम. बी. बोंदे, ऍड. हेमराज बेंचण्णावर, ऍड. श्रीधर मुतगेकर, ऍड. आर. एन. नलवडे हे काम पाहत आहेत.