तृणमूल काँगेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
कोलकाता / वृत्तसंस्था
भारतातील 30 टक्के मुस्लीम एकत्र आले तर ते 4 पाकिस्ताने निर्माण करू शकतील, अशी दर्पोक्ती तृणमूल काँगेसचा उमेदवार शेख आलम याने केली असल्याचा आरोप केला जात आहे. पश्चिम बंगालमधील बीरभूम विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना त्याने हे विधान केल्याचे सांगितले जात असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 30 सेकंदाचा हा व्हिडीओ असून तो गुरुवारी सकाळपासून प्रसारित होत आहे. मात्र, अद्याप त्याचा इन्कारही संबंधित उमेदवाराने केलेला नाही. या व्हिडीओवर अनेक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचार शिगेला पोहचला आहे. 27 मार्चला राज्याच्या 294 मतदारसंघांमधील 30 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. राज्यात मतदारांचे ध्रुवीकरण होत असल्याची वृत्ते प्रसिद्ध होत आहेत. अशा स्थितीत अशी प्रक्षोभक विधाने करून हे ध्रुवीकरण अधिक वाढविण्याचा प्रयत्न काही नेत्यांकडून केला जात असल्याबद्दल सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त होत आहे.