प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हा आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे अनोखे नाते आहे. संपूर्ण महाराष्ट्र यशवंत विचारांवर चालतो. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी आम्हाला प्रचंड आदर आहे. सातारचे सुपूत्र म्हणून त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे नमूद करतच सातारा येथील नवीन मेडिकल कॉलेजला ‘स्वर्गीय यशवंतराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय’ अस नाव देण्यात यावे,’ असा एकमुखी ठराव सातारा जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला.
याचवेळी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात नाना पाटील यांचा पुतळा उभारण्यात यावा आणि मराठा आरक्षण मिळावे, असे दोन ठरावही मांडण्यात आले. दरम्यान, या तीनही ठरावांना हात उंचावून आणि टाळ्यांच्या गजरात ‘मंजूर… मंजूर’ म्हणून मान्यता देण्यात आली. दरम्यान, मेडिकल कॉलेज नामकरण आणि नाना पाटील यांच्या पुतळ्याच्या अनुषंगाने मांडण्यात आलेले ठराव तत्काळ राज्य शासनाकडे पाठवून त्याला मान्यता मिळावी म्हणून सर्वपक्षीय प्रयत्न करण्यात यावेत, असेही एकमुखी नमूद करण्यात आले.
सातारा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, या सभेत महावितरण बिल आकारणी, कोरोना महामारी, बोगस अभियंता आणि समाजकल्याण विभाग तसेच पशुसवंर्धन विभागाकडील योजनांवर चर्चा झाली.
सभेच्या सुरुवातीलाच विविध विषयांना मंजूर देत असतानाच कोरोना महामारी आणि तिसरी लाट उपाययोजना यावर सविस्तर चर्चा झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी याबाबतचे विवेचन केले. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता त्याचा सामना करण्यासाठी सातारा जिल्हा सज्ज झाला असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, असा ठराव यावेळी मांडण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. मात्र, मराठा समाजाला आता ख्रया अर्थाने आरक्षणाची गरज आहे. ते मिळालेच पाहिजे आणि ते मिळावे म्हणून राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, सुरेंद्र गुदगे, भीमराव पाटील, बापूराव जाधव, मनोज पवार, शिवाजी सर्वगोड, भारती पोळ, अर्चना देशमुख, दत्ता अनपट, जयवंत भोसले, अरुण गोरे, अन्य सदस्यांनी आपले प्रश्न मांडत विविध विषय सुचवले. दीपक पवारांनी बोगस अभियंता प्रकरणाचे काय झाले, अशी विचारणा केली. याचवेळी जे बोगस अभियंता आहेत त्यांची नावे प्रसिध्द करा, असे आदेश अध्यक्ष उदय कबुले यांनी बांधकाम विभागाला दिले. दरम्यान, त्याचा अहवाल पंधरा दिवसात देण्यात यावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी दिले.
सर्वगोड-थोरात यांच्यात शाब्दिक चकमक
कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय पुन्हा एकदा समोर आला. मात्र, हा विषय अध्यक्ष उदय कबुले यांनी नियमांचा आधार घेत गुंडाळला आणि त्यांना गप्प केले. हा विषय पालकमंत्री यांच्या अखत्यारीत असून आपण आपले काम केले आहे. जिल्हा परिषद आता यामध्ये नाही. जागेचा निर्णय ते घेतील अथवा दुसरी जागा शोधतील, असे सांगत त्यांना खाली बसण्यास भाग पाडले. याचवेळी मनोज पवार, शिवाजी सर्वगोड, राजा शेलार यांनी थोरात यांना लक्ष्य केले. त्यामुळे थोरात पुन्हा संतापले आणि ‘मी पुन्हा सांगतोय; असले बोलायचे नाही,’ असे बोलताच सर्वगोड आक्रमक होतच उठले. यावर अध्यक्ष कबुले यांनी मध्यस्थी केली आणि हा विषय थांबला.