प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहराचे प्रवेशद्वार असलेल्या मोळाचा ओढा येथून राजवाडय़ाकडे जाणारा रस्ता काही दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आला आहे. मात्र रस्त्याचे काम करताना गुलमोहर कॉलनीतील मुख्य रस्त्यालगत असलेला अरुंद पूल सध्या वाहनधारकांना अपघाताचे निमंत्रण देत उभा असून त्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. येथे दोन, तीन अपघातही घडले असून याबाबत ग्रामपंचायतीने डोळय़ावर पट्टी बांधलेली आहे.
शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील राजवाडा ते मोळाचा या शहरात जाणाऱया मुख्य रस्त्यालगत येथे अनेक वाहनांची वर्दळ असते. अबालवृध्द प्रवाशांना घेवून तिथून रिक्षा, बसेस धावत असतात. तर शहरात विविध कारणांसाठी हजारो वाहने या रस्त्यावर प्रवास करत असतात. गतवर्षी याच रस्त्यावर असंख्य खड्डय़ांनी अनेकांचे मणके ढिले केले आहेत. मात्र आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम करण्यात आहे.
हे डांबरीकरण करत असताना शाहुपुरी ग्रामपंचायत हद्दीतील गुलमोहर कॉलनी येथील मुख्य रस्त्यालगत हा धोकादायक ओढा दिसून येत आहे. त्यावर असलेला अरुंद व रस्त्याचे मूळ माप यात खूप तफावत आहे. या अरुंद पुलावर अनेक अपघात झाले आहेत याकडे शाहुपुरी ग्रामपंचायत लक्ष देईल का ? असा सवाल ग्रामपंचायत सदस्य नवनाथ जाधव व शोभा केंडे तसेच या रस्त्यावरुन प्रवास करणाऱया नागरिकांमधून विचारला जात आहे.