ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन : मंदिरे असल्याने जागा राखीव ठेवण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
यमनापूर येथील 8 एकर 33 गुंठे जागा ही गायराणसाठी राखीव ठेवणे गरजेचे आहे. या ठिकाणी आरटीओ, लेबर कमिशनर कार्यालय, पाणी पुरवठा विभाग सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र ही जागा यमनापूर गावची असून त्या ठिकाणी गणपती मंदिर तसेच वाल्मिकी मंदिर आहे. तेंव्हा ही सर्व जागा यमनापूरसाठीच राखीव ठेवावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.
यमनापूर गावचा समावेश महापालिकेमध्ये करण्यात आला आहे. मात्र तेंव्हापासून या गावची जमीन विविध प्रकल्पांसाठी हिसकावून घेण्यात आली आहे. आता या असलेल्या जागा बळकावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शंभर वर्षांपासूनच त्या ठिकाणी मंदिरे आहेत. असे असताना ती जागा घेण्याचा प्रयत्न सुरू असून तो तातडीने थांबावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सिदराज चन्नहोसूर, बी. बी. गस्ती, एस. एस. गस्ती, पी. एम. नाईक, एल. एफ. नाईक, रामाप्पा गस्ती, निंगाप्पा पाटील, प्रकाश नाईक, फकिराप्पा शिगीहळ्ळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.