दोन दिवसांत 36 नवे रुग्ण : तिघांचे बळी, 42 जण संसर्गमुक्त
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाची साथ आटोक्यात येण्याची चिन्हे अद्याप दिसून आलेली नाही. त्यात भरीस भर म्हणजे मागील 24 तासांत कोरोनाचे 3 बळी गेले आहेत. तर शुक्रवारी 24 तर शनिवारी 12 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 601 वर पोहोचली आहे. मृतांचा आकडा 25 वर जाऊन पोहोचला आहे. आरोग्य खात्याने सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या ‘हेल्थ बुलेटीनद्वारे’ ही माहिती दिली आहे.
कोरोनावर नियंत्रण येत असतानाच मागील दोन दिवसांत राज्यात 36 नवे रुग्ण सापडले आहेत. शनिवारी बेंगळूर शहर जिल्हय़ात 4, विजापूर आणि तुमकूरमध्ये प्रत्येकी 2 तसेच बेळगाव, बागलकोट, बिदर, चिक्कबळ्ळापूर जिल्हय़ांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर शुक्रवारी मंडय़ा जिल्हय़ात 8, दावणगेरे 6, बेळगाव 3, मंगळूर आणि गुलबर्गा प्रत्येकी 2, धारवाड, विजापूर आणि चिक्कबळ्ळापूर जिल्हय़ात प्रत्येकी 1 असे एकूण 24 रुग्ण आढळले. याच दरम्यान शुक्रवारी 22 जण तर शनिवारी 20 जण संसर्गमुक्त झाले आहेत.
विजापूरमध्ये शनिवारी एकाच रुग्णामुळे 22 वर्षीय युवक आणि 45 वर्षीय पुरुषाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जिल्हय़ात आतापर्यंत 46 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 11 जण संसर्गमुक्त झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. बागलकोट जिल्हय़ातील जमखंडी येथील 45 वर्षीय महिलेला देखील कोरोनाची लागण झाली आहे.
बेंगळूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. 38 वर्षीय महिला, 30 वर्षीय युवक आणि 26 वर्षीय युवतीला संसर्ग झाला आहे. 30 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आढळलेल्या (रुग्ण क्रमांक 565) 64 वर्षीय वृद्धेमुळे या तिघांना बाधा झाली आहे. बेंगळूर शहर जिल्हय़ात आतापर्यंत 145 कोरानाग्रस्त आढळून आले असून त्यातील 71 जण संसर्गमुक्त झाले आहेत. तर 6 जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर एकाने इस्पितळाच्या तिसऱया मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
24 तासात तीन बळी
राज्यात महामारी कोरोनामुळे एकाच दिवसात तिघांचे बळी गेले आहेत. दावणगेरे येथे 69 वर्षीय वृद्ध, बिदरमध्ये 82 वर्षीय वृद्ध आणि बेंगळूर शहर जिल्हय़ातील 63 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबळींची संख्या 25 वर पोहोचली आहे. एकाच दिवसात तिघांचे बळी गेल्याने राज्यात भीतीची छाया आणखी गडद झाली आहे.