निवासस्थान सोडण्यास आंदोलकांचा नकार
कोलंबो / वृत्तसंस्था
श्रीलंकेत गेल्या तीन दिवसांपासून जनक्षोभ माजल्यानंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी आपल्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना याबाबत माहिती दिली आहे. श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाने याबाबत स्पष्टोक्ती दिली असली तरी राष्ट्रपती निवासस्थानावर कब्जा केलेले आंदोलक तेथून माघारी फिरण्यास तयार नाहीत. राष्ट्रपती निवासस्थानातच ठाण मांडण्याची तयारी आंदोलकांनी केली आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजीनामा देत नाहीत तोपर्यंत राष्ट्रपती भवन रिकामे करणार नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, श्रीलंकेत सर्वपक्षीय सरकार स्थापन झाल्यानंतर विक्रमसिंघे सरकारचे अन्य मंत्रीही राजीनामा देणार आहेत.
श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवन परिसरात सध्या आंदोलकांची वर्दळ असलेली दिसून येत आहे. त्यांची मौज-मजा आणि विविध बेजबाबदार कारवायांची छायाचित्रे समोर येत आहेत. सोमवारी सकाळी आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाच्या मैदानात साचलेला कचरा साफ करून आपली जबाबदारी दाखवून दिली. आंदोलकांनी मैदान पूर्णपणे साफ करून कचरा गोळा केला, पिशव्यांमध्ये भरून तो फेकून दिला. तसेच तेथील किचनमध्ये अन्नपदार्थ बनवून खातानाही काही लोक निदर्शनास आले आहेत.
राष्ट्रपतींच्या निवासस्थानात भुयारी मार्ग
राष्ट्रपती निवासस्थानातील आणखी एक व्हिडीओ समोर आला असून राष्ट्रपती भवनातील गुप्त भुयारी मार्ग असल्याचा दावा करण्यात येत आहे. राष्ट्रपती या गुप्तचर मार्गाने आपला जीव वाचवून देशातून पळून गेल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. हा बंकर राष्ट्रपती भवनाच्या पहिल्या मजल्यावर बांधण्यात आला आहे. बंकरच्या बाहेर जाण्यापूर्वी येथे लाकडी कपाट बसवण्यात आले आहे.
गॅस पुरवठय़ाचे गोटाबायांकडून निर्देश
भूमिगत असलेल्या राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी सोमवारी श्रीलंकेच्या प्रशासकीय अधिकाऱयांना एक निर्देश जारी केला आहे. त्यांनी अधिकाऱयांना गॅस अनलोडिंग आणि पुरवठा करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत आयात करण्यात आलेल्या गॅस पुरवठय़ाचे पहिले जहाज बंदरावर दाखल झाले आहे. त्यानंतर आता 3,740 मेट्रिक टन गॅस वाहून आणणारे दुसरे जहाज 13 जुलै रोजी आणि 3,200 मेट्रिक टन गॅस आणणारे जहाज 15 जुलै रोजी पोहोचेल.
नव्या सरकारसाठी विरोधी पक्षांची बैठक
विरोधी पक्षांनी श्रीलंकेत नवीन सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. मुख्य विरोधी पक्ष समागी जन बालवेगया (एसजेबी) आणि त्यांचे सहयोगी पक्ष सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्यासाठी लवकरच विशेष पक्षाची बैठक बोलवू शकतात. विरोधी पक्षांच्या प्रयत्नांना यश आले तर दोन महिन्यांतील हे तिसरे सरकार ठरणार आहे.