प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादाचा परिणाम
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यांतर्गत रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरू व्हावी याकरिता नैर्त्रुत्य रेल्वेने बेंगळूर-बेळगाव ही त्रिसाप्ताहिक रेल्वे सुरू केली. ही रेल्वे सुरू होऊन आठवडा उलटला तरी अद्याप प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बेंगळूर ते बेळगाव ही स्पेशल सुपरफास्ट रेल्वे रिकामी धावताना दिसत आहे.
22 मेपासून नैर्त्रुत्य रेल्वेने बेंगळूर-बेळगाव व बेंगळूर-म्हैसूर या मार्गांवर रेल्वे सुरू केल्या. पहिल्याच दिवशी बेंगळूरवरून 176 प्रवासी बेळगावमध्ये दाखल झाले. तर 99 प्रवासी बेंगळूरच्या दिशेने रवाना झाले. 14 डब्यांच्या या गाडीमध्ये 1 हजार 484 प्रवासी बसण्याची क्षमता आहे. परंतु पहिल्याच दिवशी रिकामी रेल्वे धावल्याचे चित्र दिसत होते.
आठवडा उलटला तरी 300 च्यावर प्रवाशांची संख्या पोहचलेली नाही. सोमवार दि. 25 मे रोजी सर्वाधिक 319 प्रवाशांनी प्रवास केला. कोरोनाची धास्ती अद्यापही प्रवाशांच्या मनामध्ये असल्याने प्रवासीसंख्या वाढत नसल्याचे दिसून येत आहे. बेंगळूरसारख्या शहरामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये दररोज वाढ होत असल्याने नागरिकांनी अद्यापही घरीच राहणे पसंत केले आहे. बेंगळूर-म्हैसूर रेल्वेलाही यापेक्षा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.
वास्को-निजामुद्दीन रेल्वेला चांगला प्रतिसाद अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर वास्को ते हजरत निजामुद्दीन मार्गावर धावणारी गोवा एक्स्प्रेस अखेर सोमवारी धावली. गोवा, बेळगाव, हुबळी या परिसरातून उत्तर भारतात जाणारी ही पहिलीच रेल्वे होती. त्यामुळे या रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकूण 1084 प्रवासी क्षमता असणाऱया या रेल्वेमध्ये 1076 सीटचे बुकिंग करण्यात आले होते. त्यामुळे या रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.