प्रतिनिधी / पणजी :
काँग्रेसचे फोंडा मतदारसंघाचे आमदार रवी नाईक यांचे दोन सुपुत्र रितेश आणि रॉय नाईक यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये चांगले भवितव्य असून तोच राज्यासह देशाचा विकास करू शकतो म्हणूनच त्या पक्षात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाची शाल, पुष्पगुच्छ आणि प्रवेशाची पावती देऊन त्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले.
पणजीतील भाजप मुख्यालयात हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. केंदीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे, दामोदर नाईक व भाजपची इतर नेतेमंडळी त्यावेळी उपस्थित होती. भाजपचे काम आपण पुढे नेणार असून या पक्षात काम करण्यात वाव आहे. भाजपला पुढे चांगले भविष्य असून या पक्षाने गोव्यासह देशात चांगला विकास केला आहे. पक्षाचे कार्यकर्ते तळागाळात गावात असून युवक वर्गही भाजपाच्या मागे आहे. शिवाय भाजपमध्ये पुढे जाण्यासाठी चांगली योग्य संधी आहे. म्हणूनच पक्षात प्रवेश केल्याचे ते म्हणाले.
श्री तानावडे या प्रसंगी म्हणाले की काँग्रेसचे अनेक नेते भाजपकडे वळत असून पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यांची इच्छा असेल तर त्यांना पक्षात घेण्यास काहीच अडचण नाही. कोणत्याही अटीविना त्यांचा भाजपात प्रवेश झाला असून ते पक्षात चांगले काम करतील आणि पक्षाला पुढे नेतील असा विश्वास श्री. तानावडे यांनी प्रकट केला.
श्री. नाईक म्हणाले की भाजपला गोव्यासह देशभरात पाठिंबा मिळत असून आशीर्वाद पक्षाच्या मागे आहेत. जनतेचा पाठिंबा असल्यानेच व पक्ष पुढे जात असून विकासाला प्राधान्य देत आहे असे सांगून श्री नाईक यांनी रितेश रॉय यांचे पक्षात स्वागत व अभिनंदन केले.
त्यांचे अनेक समर्थक कार्यकर्ते यांनी देखील त्यांच्यासमवेत भाजपामध्ये प्रवेश केला. फोंडा पालिकेतील नगरसेवक आनंद नाईक, श्री. आगियार तसेच कुर्टी-खांडेपार पंचायतीचे पंच दादी नाईक व इतरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी भाजपचे फोंडा येथील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. रितेश, रॉय नाईक यांच्या इच्छेनुसार हा त्यांचा भाजपा प्रवेश झाल्याचे सांगण्यात आले व हा निर्णय आम्हीच घेतल्याचा खुलासा त्यांनी केला.