ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोना लसीचे संपूर्ण जगभरात संशोधन सुरू आहे. मात्र, ही लस बाजारात येईपर्यंत अजून दोन वर्षांचा कालावधी जाईल. त्यामुळे प्रत्येकाने कोरोनाशी जुळवून घेत जगलं पाहिजे, असे मत जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हिड नाबारो यांनी व्यक्त केेले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाबरो यांनी आज एका इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधला. यावेळी बोलताना नाबारो म्हणाले, जगभरात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावरील औषधे आणि लसीचे संशोधन जगात युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, कोरोनवरील लस बाजारात यायला अजून दोन वर्षांचा कालावधी लागेल. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाविषयी शिक्षित करून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
भारताने कोरोनाची परिस्थिती योग्य पध्दतीने हाताळली आहे. त्यामुळे भारतातील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी जगाच्या तुलनेत कमी आहे. भारतातील रुग्णसंख्या दुप्पटीचा वेग 11 दिवसांचा आहे. म्हणून भारतात कोरोनाचा प्रसार कमी करता येऊ शकतो. भारतीय नागरिकांमध्ये कोरोनाशी जुळवून घेण्याची क्षमता आहे. आणि ते कोरोनाशी जुळवून घेत जगत आहेत. त्यामुळे जगभरातील सर्वच नागरिकांनी आता कोरोनाशी जुळवून घेण्याची गरज आहे, असेही नाबारो म्हणाले.