5 वर्षे मिळणार सवलत : 25 हजार कोटींची रक्कम मंजूर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वाहन उत्पादन व वाहनाच्या सुटय़ा भागांच्या उत्पादनासाठी पीएलआय योजनेकरिता आत्तापर्यंत 115 कंपन्यांनी अर्ज दाखल केला असल्याची माहिती सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. अवजड उद्योग मंत्रालयाने या संदर्भातली माहिती नुकतीच दिली आहे.
23 सप्टेंबर 2021 पासून ही पीएलआय योजना अस्तित्वात आली होती. याकरिता अर्ज दाखल करण्यासाठी 9 जानेवारी 2022 पर्यंतची तारीख देण्यात आली होती. त्यानुसार पीएलआय (प्रोडक्ट लिंकड् इनसेंटीव्ह) योजनेअंतर्गत लाभ उठवण्यासाठी वाहन तसेच वाहनांच्या सुटय़ा भागांच्या निर्मितीची इच्छा असणाऱया कंपन्यांनी याकरता अर्ज दाखल केला आहे. यांची संख्या जवळपास 115 इतकी झाली आहे.
एप्रिल 2022 पासून 5 वर्षे या क्षेत्रातील कंपन्यांना पीएलआयअंतर्गत आवश्यक ती सवलत मिळवून दिली जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. या योजनेअंतर्गत 25 हजार 938 कोटीहून अधिक रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. स्थानिक तसेच देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सरकारने पीएलआय योजना सुरू केली आहे. बॅटरी निर्मितीसह इलेक्ट्रिक वाहने आणि हायड्रोजनसेलवरील वाहनांच्या उत्पादनासाठी सरकार आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी पुढे होणार आहे.