प्रतिनिधी/ वाई
येथील महागणपती मंदिर परिसरातील काशिविश्वेश्वर मंदिराच्या विहिरीचा गाळ काढताना सतराव्या शतकातील कटय़ार व खंजीर ही हत्यारे आढळून आली. ही हत्यारे पोलिसांनी ताब्यात घेतले असून लवकरच पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
येथील महागणपती मंदिरालगतच्या काशीविश्वेश्वर मंदिर परिसरात फरसबंदी घाटावर पुरातन आडवजा विहीर आहे. त्यात नियमित पूर्वापार मोठा पाणी साठा असतो. या आडातील पाण्याचा अनेक वर्षात उपसा बंद असल्याने व देखभालीअभावी पाण्याला दुर्गंधी येत होती. या मंदिराचे ट्रस्टी शैलेंद्र गोखले यांनी आडाची स्वच्छता करण्याच्या हेतूने गाळ काढण्यास मागील पंधरा दिवसांपासून सुरुवात केली आहे. शुक्रवारी (दि 18) गाळ काढत असताना काळामध्ये सात कटय़ार आणि एक खंजीर आढळून आला. याबाबतची माहिती पोलीस उपअधीक्षक डॉ शीतल जानवे खराडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना गोखले यांनी कळवली. त्यांनी तत्काळ मंदिर परिसरात भेट देऊन पंचनामा करून हत्यारे ताब्यात घेतली. याबाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजय बोऱहाडे, तहसीलदार रणजीत भोसले व सातारा येथील शिवाजी महाराज संग्रहाला कळविण्यात आले.
याबाबत शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांना विचारले असता त्यांनी या बाबत माहिती मिळाल्याचे सांगितले आहे. ही हत्यारे छायाचित्र पाहून सतराव्या शतकातील असावीत असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. लवकरच ही हत्यारे संग्रहालयाच्या ताब्यात घेण्यात येतील असे सांगितले.