प्रतिनिधी/ मिरज
जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीत 32 वे रस्ता सुरक्षा अभियान सुरू असून, बुधवारी शहराच्या प्रमुख मार्गावरुन भव्य रस्ता सुरक्षा रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध शाळांमधून सुमारे पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. लक्ष्मी मार्केट येथे वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करणाऱ्या चित्ररथ आणि सेल्फी पॉईंटचेही उद्घाटन झाले. यावेळी विद्यार्थी व नागरिकांनी ‘मी वाहतूक नियमांचे पालन करेन’ अशी शपथ घेतली. जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या उपस्थितीत रस्ता सुरक्षा रॅलीचा समारोप झाला
ही रॅली मिरज शहर पोलीस ठाण्यापासून भंडारीबाबा दर्गा, पारकट्टा, किसान चौक, श्रीकांत चौक, फुलारी कॉर्नर, दत्त चौक मार्गे बालगंधर्व नाट्यगृहापर्यंत काढण्यात आली. या रॅलीत उपायुक्त स्मृती पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक मनीषा डूबुले, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, निरीक्षक राजू ताशीलदार यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.