प्रतिनिधी / कोरेगाव :
देशात सर्वात अव्वल, नावलौकिक प्राप्त आणि पक्षीय राजकारणापासून अलिप्त असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनेल निश्चितपणाने यश मिळवेल, सर्वच जागांवर उमेदवार विजयी होतील, असा विश्वास राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे काम अत्यंत चांगले आहे. सामान्यातील सामान्य शेतकऱ्याला तात्काळ शेतीसाठी कर्ज दिले जाते. बँक नेहमीच शेतकऱ्यांचा विचार करत असून, बँकेच्या हितासाठी सहकार पॅनेललाच विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आ. शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, उमेदवार शिवाजीराव महाडिक, रामभाऊ लेंभे, प्रदीप विधाते, कांचन साळुंखे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने आदी उपस्थित होते.