निपाणी तालुक्यात रुग्णसंख्येत होतेय वाढ : नियमावलीचे मात्र तीनतेरा : नियमावलीचे पालन करणे आवश्यक
प्रतिनिधी / निपाणी
दोन महिन्यांपूर्वी निपाणी तालुक्यात कोरोनाने कहर माजविला होता. गेल्या महिन्याभरात रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे प्रशासन, नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येत किंचित वाढ होत आहे. तालुक्यात दररोज सुमारे 10 ते 15 कोरोना रुग्ण वाढतच चालले आहेत. तज्ञांनी कोरोनाच्या तिसऱया लाटेचा वर्तविलेला अंदाज पाहता हा धोका ओळखून नागरिक व प्रशासनाने वेळीच जागरुक होण्याची गरज व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेत निपाणी तालुक्यात दोन महिन्यांत 200 हून अधिक जणांचा बळी गेला. हजारो नागरिक कोरोनाबाधित झाले होते. प्रत्यक्षात प्रशासनाकडे मात्र वेगळीच आकडेवारी होती. जुलै महिन्यात रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे प्रशासनाबरोबर नागरिकही निर्धास्त झाले. बहुतांशी निर्बंध उठल्यामुळे नागरिकांची वर्दळ वाढत व्यवहार सुरळीत सुरू झाले. मात्र सॅनिटायझर, मास्कचा वापर, सामाजिक अंतर या सुरक्षाविषयक नियमांचे पालन करण्याकडे मात्र दिवसेंदिवस दुर्लक्ष होत आहे.
याचाच परिणाम म्हणून गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. एकीकडे महाराष्ट्र व केरळमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे कर्नाटक सरकारने राज्याच्या सीमेवर कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार निपाणी तालुक्यातील कोगनोळीनजीक राष्ट्रीय महामार्गावर तसेच निपाणी-मुरगूड रोडवर तपासनाके उभारून वाहनधारकांची कसून चौकशी केली जात आहे. आरटीपीसीआरचा 72 तासांमधील अहवाल असल्याशिवाय प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.
असे असले तरी निपाणी शहरात मात्र सुरक्षाविषयक नियम सर्रासपणे पायदळी तुडविले जात असल्याचे दिसून येत आहे. बहुतांशी वाहनधारक व नागरिकांनी मास्कचा वापर थांबविला आहे. रस्त्यावर नेहमीप्रमाणे गर्दी वाढली आहे. व्यावसायिकांनीही सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुन्हा एकदा कोरोना फैलावाचा धोका निर्माण झाला आहे. अशातच पोलीस कारवाईदेखील थंडावल्यामुळे नियमांचा सर्रास फज्जा उडाल्याचे दिसत आहे. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार करता नागरिक व प्रशासनाने सुरक्षाविषयक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.