दोन्ही बाजूच्या सैन्यांकडून 12 पर्यंत पूर्ण होणार प्रक्रिया
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतासमवेतचा वाद सोडवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल म्हणून चीनच्या सैन्याने पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या गोग्रा-हॉट स्प्रिंग्समधील ‘पेट्रोलिंग पॉईंट 15’वरून मागे सरकण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्याची पुष्टी त्यांनी शुक्रवारी केली.
भारताने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनाप्रमाणेच चीनच्या संरक्षण मंत्रालयानेही निवेदन जारी केले आहे. दरम्यान, भारतीय आणि चिनी सैन्याकडून 12 सप्टेंबरपर्यंत माघारीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी निवेदन जारी करून स्पष्ट केले आहे.
‘चीन-भारत कोअर कमांडर स्तरावरील बैठकीच्या 16 व्या फेरीत झालेल्या सहमतीनुसार, चिनी आणि भारतीय सैन्याने ‘जियान दबान’ परिसरातून (चीन पीपी-15 क्षेत्राला या नावाने संबोधतो) सुसूत्रित आणि नियोजित पद्धतीने मागे सरकण्यास सुरुवात केली आहे. सीमावर्ती भागांतील शांततेसाठी ते अनुकूल ठरणार आहे’, असे चीनच्या निवेदनात नमूद केले आहे.
गोग्रा-हॉट स्प्रिंग्समध्ये दोन्ही बाजूंनी तयार केलेली सर्व तात्पुरती बांधकामे आणि संबंधित पायाभूत सुविधा नष्ट केल्या जातील आणि परस्पर सहमतीने त्याची खातरजमा केली जाईल. राहिलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसह भारत-चीन सीमा भागात शांतता पुन्हा स्थापित करण्यासाठी दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली आहे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या करारामुळे दोन्ही बाजूंनी या भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे काटेकोरपणे पालन केले जाईल आणि त्याचा आदर केला जाईल तसेच कोणत्याही स्थितीत एकतर्फी बदल होणार नाही, असेही त्यात म्हटले आहे.
भारत आणि चीनचे सैन्य 2020 मध्ये गलवान खोऱयातील ‘पीपी-14’वरून मागे सरकलेले आहे. तेथे जून, 2020 मध्ये दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये भीषण चकमक झाली होती. तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पँगाँग तलाव क्षेत्र आणि ऑगस्टमध्ये गोग्रा येथील ‘पीपी-17 ए’वरून माघार घेण्यात आली होती. डेमचोक आणि डेपसांग येथील प्रश्न अद्यापही सुटलेले नसून चिनी सैनिक अजूनही डेपसांग पठाराच्या उत्तरेकडील भारतीय भूभागाचा मोठा भाग बळकावून आहेत, असे मानले जाते.
जुलैमध्ये झालेल्या कोअर कमांडर स्तरावरील चर्चेच्या शेवटच्या फेरीत पीपी-15 वर चर्चा झाली होती, परंतु चिनी सैन्याने अवास्तव सूचना मांडल्याच्या पार्श्वभूमीवर माघारीचे सोपस्कार मार्गी लावण्यास भारताच्या अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. पुढील आठवडय़ात उझबेकिस्तानमध्ये शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनची शिखर परिषद होणार आहे. त्यास भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. त्याच्या आधी चीनची ही माघार नोंदली गेली आहे.