उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हलगा-मच्छे रस्ता कामाला स्थगिती : शेतकऱयांना मोठा दिलासा
प्रतिनिधी /बेळगाव
न्यायालयाने हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला कायमस्वरुपी स्थगिती दिली होती. तरीदेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाने हे काम सुरूच ठेवले. त्यामुळे शेतकऱयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या ठिकाणी न्यायालयाने सुरू असलेल्या रस्त्याचे काम तातडीने थांबवा, असा आदेश दिला. त्यामुळे बुधवारी या रस्त्यावर काम करणारी सर्व वाहने तसेच साहित्य तेथून हलविण्यात आले आहे. यामुळे शेतकऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम गेल्या दहा वर्षांपासून सुरू करण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये प्रत्यक्षात या कामाला सुरुवात करण्यात आली. येथील शेतकऱयांचा विरोध असतानाही हा रस्ता करण्यात येत होता. यामुळे शेतकऱयांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कायमस्वरुपी स्थगिती दिली असतानाही जिल्हा प्रशासनाने व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दडपशाही करत काम सुरूच ठेवले होते. त्यामुळे शेतकऱयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. धारवाड येथील खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. त्याठिकाणी ऍड. रवीकुमार गोकाककर यांनी शेतकऱयांची बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने हे काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
बुधवारी या रस्त्याचे काम पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. याचबरोबर तेथील साहित्यदेखील हलविण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून येळ्ळूर रस्त्याला लागूनच कामगारांनी ठाण मांडले होते. अनेक वाहने त्याठिकाणी होती. मात्र ती हलविल्याने आता शेतकऱयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.