भारत जागतिक अर्थव्यवस्थांत पाचव्या क्रमांकावर पोहोचलेला असून याकामी जबरदस्त हातभार लागतोय तो अतिश्रीमंत, श्रीमंत नि मध्यमवर्गीयांचा…मागील पाच-सहा वर्षांत आर्थिक आघाडीवर जो विकासाचा झपाटा पाहायला मिळालाय त्याच्या अनुरूप त्यांची संख्या देखील मोठय़ा प्रमाणात फुगलीय अन् यात महत्त्वाचा वाटा उचलताहेत ती केवळ ‘मेट्रो’च नव्हे, तर अन्य शहरे देखील…
5 ते 30 लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गीयांचे प्रमाण 2004-05 आर्थिक वर्षातील 14 टक्क्यांवरून गेल्या आर्थिक वर्षात 31 टक्क्यांवर पोहोचलेय आणि येऊ घातलेल्या आठ वर्षांत म्हणजेच 2029 पर्यंत 46 टक्क्यांचा स्तर गाठेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. हल्लीच प्रसिद्ध झालेल्या मध्यमवर्गीयांसंबंधीच्या एका अहवालानुसार, 2047 पर्यंत हा आकडा स्पर्श करेल तो 63 टक्क्यांना…विश्लेषकांनुसार, जर 2047 पर्यंत राजकीय आणि आर्थिक सुधारणांना अपेक्षेनुसार यश मिळाले, तर सर्वांत खालच्या दोन पायऱयांवर उभे असलेले ‘महत्त्वाकांक्षी’ लोक नि ‘सर्वसामान्य’ हे दोन गट मोठय़ा प्रमाणात आकाराने कमी होतील…
महत्त्वाची बाब म्हणजे मध्यमवर्गाची नेमकी व्याख्या तयार करणे अभ्यासकांना कधीही जमलेले नाहीये. त्यामुळे विविध अहवालांनी जाहीर केलेल्या संख्येत फार मोठे अंतर दिसतेय. भारतातील मध्यमवर्गीयांचा आकडा 5 ते 40 कोटीदरम्यान असल्याचे गृहीत धरल्यास प्रश्न पडतोय तो त्यांच्या खरेदी करण्याच्या ताकदीसंबंधी…अहवालाने सात विविध गट तयार केलेले असून सर्वांत शेवटचा क्रमांक दिलाय तो ‘सर्वसामान्य’ व्यक्तीला. त्याचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 25 हजार रुपयांपेक्षा कमी वा 1 हजार 700 डॉलर्स (2020-21 नुसार)…‘सुपर रिच’ वा ‘अतिश्रीमंत कुटुंबा’कडे 2 कोटी रुपयांहून वा 2 लाख 70 हजार डॉलर्सहून अधिक रकमेची दरवर्षी भर पडत असून या दोन्ही घटकांच्या मध्ये मध्यमवर्गीय गट अडकलाय…अशा गटांच्या निर्मितीमुळे त्यांच्या क्षमतेविषयी जास्तीत जास्त अचूक अंदाज व्यक्त करणे शक्य होतेय…

‘महत्त्वाकांक्षी’ गटात समाविष्ट होणाऱयांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 25 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत ठरविण्यात आलेय. त्यातील प्रत्येक 10 कुटुंबांपैकी पाच जण स्वतःच्या वाहनाचे मालक…झेप घेण्यासाठी ‘सतत प्रयत्न करणाऱया’ व्यक्तींचा वेगळा गट करण्यात आला असून त्यातील प्रत्येकाचे उत्पन्न वर्षाला 5 लाख ते 15 लाखांच्या दरम्यान अन् अशा 10 कुटुंबांपैकी सुमारे तिघांकडे स्वतःचे वाहन…श्रीमंत लोकांचे वार्षिक उत्पन्न 30 लाख रुपयांहून जास्त. त्यातील प्रत्येक कुटुंबाच्या पदरी स्वतःचे वाहन विसावलेय, तर प्रत्येक करोडपतीच्या घरासमोर उभ्या आहेत तीन-तीन गाडय़ा…
महाराष्ट्र हे सर्वांत श्रीमंत राज्य असून तिथे वास्तव्य आहे ते 6.4 लाख अतिश्रीमंत लोकांचे…2021 नुसार, दिल्ली दुसऱया स्थानावर (1.8 लाख कुटुंबे), गुजरात तिसऱया (1.4 लाख कुटुंबे), तामिळनाडू चौथ्या (1.3 लाख कुटुंबे), तर पंजाब पाचव्या (1.1 लाख कुटुंबे) क्रमांकावर विसावलाय…2 कोटी रुपयांहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या ‘सुपर रिच’ व्यक्तींची संख्या 1994-95 आर्थिक वर्षातील 98 हजारांवरून 2020-21 आर्थिक वर्षात 18 लाखांवर पोहोचलीय आणि गतीने वरच्या दिशेने झेपावणाऱया शहरांत समावेश होतोय तो सुरत व नागपूर यांचा…
वैयक्तिक संपत्तीच्या यादीत भारत सातवा…
जागतिक स्तरावर नजर फिरविल्यास बहुतेक वैयक्तिक संपत्ती आहे ती अमेरिका (31.5 टक्के) व चीन (18.4 टक्के) या देशांतील कुटुंबांच्या हातात. याचाच अर्थ पन्नास टक्के डॉलर्स…तर पहिल्या दहा क्रमांकांवरील राष्ट्रांच्या खिशांत तब्बल 75 टक्के….वैशिष्टय़पूर्ण बाब म्हणजे या यादीत भारत विसावलाय सातव्या स्थानावर…
देश | कुटुंबांकडील संपत्ती |
अमेरिका | 145.8 ट्रिलियन डॉलर्स |
चीन | 85.1 ट्रिलियन डॉलर्स |
जपान | 25.7 ट्रिलियन डॉलर्स |
जर्मनी | 17.5 ट्रिलियन डॉलर्स |
ब्रिटन | 16.3 ट्रिलियन डॉलर्स |
फ्रान्स | 16.2 ट्रिलियन डॉलर्स |
भारत | 14.2 ट्रिलियन डॉलर्स |
कॅनडा | 12.4 ट्रिलियन डॉलर्स |
इटली | 11.5 ट्रिलियन डॉलर्स |
ऑस्ट्रेलिया | 10.6 ट्रिलियन डॉलर्स |
भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती (फोर्ब्सनुसार)…
? जगातील 10 टक्के अब्जाधीश भारतात…
? ‘फोर्ब्स’च्या यादीत समावेश असलेल्या भारतातील 100 अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीत वर्षभरात तब्बल 800 अब्ज डॉलर्सची वृद्धी…
? गौतम अदानी यांच्या संपत्तीत गेल्या 12 महिन्यांत शंभर टक्के वाढ, तर मुकेश अंबानींच्या तिजोरीतील 5 अब्ज डॉलर्सचे पलायन…
अब्जाधीश | संपत्ती (रुपयांत) |
गौतम अदानी | 12.11 लाख कोटी |
मुकेश अंबानी | 7.10 लाख कोटी |
राधाकिशन दमानी | 2.22 लाख कोटी |
सायरस पुनावाला | 1.73 लाख कोटी |
शिव नाडर | 1.72 लाख कोटी |
सावित्री जिंदाल | 1.32 लाख कोटी |
दिलीप संघवी | 1.25 लाख कोटी |
हिंदुजा | 1.22 लाख कोटी |
कुमारमंगलम बिर्ला | 1.21 लाख कोटी |
बजाज कुटुंब | 1.17 लाख कोटी |
देश | अब्जाधीशांची संख्या | त्यांच्याकडील संपत्ती |
अमेरिका | 975 | 4.450 ट्रिलियन डॉलर्स |
चीन | 400 | 1.450 ट्रिलियन डॉलर्स |
जर्मनी | 176 | 602 अब्ज डॉलर्स |
भारत | 124 | 384 अब्ज डॉलर्स |
ब्रिटन | 120 | 266 अब्ज डॉलर्स |
हाँगकाँग | 114 | 187 अब्ज डॉलर्स |
भारतीयांचे अन्य देशांत स्थलांतर… ? संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक स्थलांतर अहवालानुसार, विविध राष्ट्रांत स्थलांतर होणाऱयांमध्ये सर्वाधिक संख्या आहे ती भारतीयांची. 2021 पर्यंत 1 कोटी 20 लाख भारतीय विदेशी नागरिक बनलेत…अन्य देशांचा विचार केल्यास मेक्सिको दुसऱया (1 कोटी 11 लाख), रशिया तिसऱया (1 कोटी 8 लाख), तर चीन (1 कोटी 1 लाख) चौथ्या स्थानावर… ? 2014 पासून 23 हजार अतिश्रीमंत भारतीयांनी अन्य राष्ट्रांच्या दिशेने धाव घेतलीय…2021-22 मध्ये चीनमधून 10 हजार, भारतातून 8 हजार, हाँगकाँगमधून 3 हजार, युक्रेनमधून 2 हजार 800, तर ब्राझीलमधून 2 हजार 500 ‘सुपर रिच’ नागरिकांनी इतर देशांचा आसरा घेणे पसंत केले… ? गेल्या सात वर्षांत 9 लाख भारतीय नागरिकांनी नागरिकत्व सोडलेय, तर गेल्या तीन वर्षांत 3 लाख 92 हजार 552 नागरिकांनी… |
शहरांचा लक्षणीय वाटा… ? या सर्वेक्षणात दिसून आल्याप्रमाणे 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 63 शहरांत भारतातील 27 टक्के मध्यमवर्गीय, तर 43 टक्के श्रीमंत राहतात…ही शहरे देशाचा विचार करता खर्च होणाऱया उत्पन्नाच्या बाबतीत 29 टक्के. एकंदरित खर्चात 27 टक्के आणि एकूण बचतीत 38 टक्के वाटा उचलतात…देशातील 55 टक्के अतिश्रीमंत राहतात ते याच शहरांमध्ये… ? मुंबई आणि दिल्लीची तुलना केल्यास महाराष्ट्राच्या राजधानीत 2.7 लाख अतिश्रीमंत कुटुंबांचा समावेश, तर देशाच्या राजधानीत ही संख्या 1.8 लाख कुटुंबे… ? सुरतमध्ये अतिश्रीमंतांचा आकडा 31 हजार इतका असून 2015-16 ते 2020-21 दरम्यान अशा कुटुंबांच्या संख्येत सर्वांत जास्त 14.1 टक्के इतकी वाढ नोंदवलीय ती गुजरातच्या याच शहराने…त्याच्या खालोखाल क्रमांक 13.1 टक्के वृद्धी दाखविणाऱया बेंगळुरूचा. तिथे अतिश्रीमंतांची संख्या 13 हजारांवरून 24 हजारांवर झेपावलीय… ? तिसऱया स्थानावर संयुक्तपणे 11.7 टक्के वाढीनिशी नाशिक (2015-16 सालातील 16 हजारांवरून अतिश्रीमंतांची संख्या 2020-21 मध्ये 27 हजारांवर) व अहमदाबाद (20 हजारांवरून 35 हजार), तर चौथा क्रमांक प्राप्त झालाय तो 11.2 टक्के वृद्धी नोंदविणाऱया चेन्नईला (26 हजारांवरून 43 हजार)… ? मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये 2015-16 आणि 2020-21 दरम्यान सर्वांत जलद 8.4 टक्के इतकी वृद्धी नोंदवली गेलीय ती केरळच्या मलप्पूरममध्ये… ? नीती आयोगाच्या अहवालानुसार, भारत ही जगातील दुसरी सर्वांत मोठी शहरी व्यवस्था आणि एकूण जागतिक शहरी लोकसंख्येत जवळपास 11 टक्के वाटा उचलणारे लोक देशातील शहरांमध्ये राहतात. |
संकलन ः राजू प्रभू