ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
प्रतिनिधी /बेळगाव
मागील काही दिवसांपासून हैदोस घातलेल्या माकडांचा हालगा ग्राम पंचायतीने बंदोबस्त केला आहे. माकडाच्या कळपाला पकडून जेरबंद केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. ग्राम पंचायतीने माकडे पकडण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे.
गावात मागील काही दिवसांपासून माकडाच्या कळपाने धुमाकूळ घालून अनेकांचे नुकसान केले आहे. घरगुती साहित्य, काचा आणि इतर फळझाडांचेही नुकसान झाले आहे. गावातील केळी, पेरू आणि इतर फळांचे नुकसान झाले आहे. दरम्यान माकडांच्या उपद्रवाला वैतागलेल्या ग्रामस्थांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रा.पं.कडे केली होती. त्यानुसार माकड पकडण्याची मोहीम हाती घेऊन माकडांना जेरबंद केले आहे.
माकडांच्या हैदोसामुळे घराची कौले, काचा, खिडक्या आणि इतर घरगुती साहित्याचे नुकसान झाले आहे. माकडांच्या उपद्रवामुळे ग्रामस्थांना विनाकारण नुकसान सोसावे लागले आहे. दरम्यान, अनेक ग्रामस्थांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे भीती निर्माण झाली होती. अखेर ग्रामपंचायतीने माकडांच्या कळपाला पिंजऱ्यात घातले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. माकडांना पकडण्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाकडून 200 रुपये वर्गणी जमा केली आहे. हालगा तरिहाळ रोड मिसळवाडी या परिसरात धुमाकूळ घातलेल्या 20 माकडांना पकडण्यात आले आहे. ग्रा.पं. सदस्य तानाप्पा पायाक्का यांनी विशेष परिश्रम घेवून माकड पकडण्याची मोहीम यशस्वी केली.