रेल्वे प्रवासी सुविधा समितीची ग्वाही : छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरील सुविधा, सुरक्षा व्यवस्थेची पाहणी : रेल्वे अधिकाऱ्यांना केल्या सूचना
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापुरातून मुंबई, पुणे आणि सोलापूर या मार्गावर रात्री उशिरा धावणाऱ्या रेल्वेगाडय़ा सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही रेल्वे प्रवासी सुविधा समितीने दिली आहे. या समितीचे सदस्य खासदार छोटूभाई पाटील, खासदार कैलास वर्मा, श्रीमती उमादेवी गोताला यांनी गुरूवारी येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला भेट देवून सुविधा आणि सुरक्षेची पाहणी केली. तसेच रेल्वे अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.
समिती सदस्य गुजरातचे खासदार छोटूभाई पाटील यांनी पाहणीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे प्रवासी सुविधा समिती गठित करून त्याव्दारे देशातील रेल्वेस्टेशनवरील प्रवासी सुविधा, सुरक्षेची पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार ही समिती पंतप्रधान कार्यालयाला अहवाल सादर करते. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनांनुसार रेल्वे विभागामार्फत कार्यवाही केली जाते. आमची समिती पुणे डिव्हिजनमध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर आली आहे. कोल्हापूरसह हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज या ठिकाणी पाहणी, तपासणी केल्यानंतर पुण्याला जाणार आहे.
बंद असलेल्या रेल्वेगाडय़ा, रेल्वे स्टेशनवरील सुविधांबाबत छोटूभाई पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले, कोरोनाच्या काळात बंद करण्यात आलेल्या रेल्वेगाडय़ांपैकी 90 टक्के रेल्वे सध्या सुरू आहेत. दहा टक्के बंद आहेत. त्या येत्या 1 जुलैपासून सुरू होणार आहेत. कोल्हापुरात मुंबई, पुणे आणि सोलापूरला जाणाऱ्या रेल्वेगाडय़ांच्या जी वेळ आहे, ती प्रवाशांना सोयिस्कर नाही. त्यामध्ये बदल करून रात्री उशिरा या रेल्वेगाडय़ा सोडल्या तर सकाळच्या वेळी प्रवासी मुंबई, पुणे, सोलापूरसारख्या शहरात पोहचू शकतील. या संदर्भात मागणीही आहे. त्यानुसार रात्री उशिराच्या वेळी या तिन्ही मार्गावर रेल्वेगाडय़ा सुरू करण्याच्या सूचना केल्या जातील. त्याची अंमलबजावणीही लवकर होईल.
कोल्हापूर टर्मिनल आहे. या ठिकाणी अद्ययावत सोयी, सुविधा प्रवाशांना मिळाव्यात यासाठी समिती आग्रही आहे. त्यासाठीच आज आम्ही प्लॅटफॉर्म, एक्स्लेटर (सरकता जिना), लिफ्ट, वेटिंग रूम, पंखे, सीसीटीव्ही, शौचालय आदींची पाहणी केली. आवश्यक त्या सूचना अधिकाऱयांना केल्या, असे छोटूभाई पाटील यांनी सांगितले.
मिरज-कोल्हापूर मार्गावरील विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. इन्फ्रास्ट्रक्चर असल्याशिवाय नवीन रेल्वेगाडय़ा सुरू करता येत नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावरील मागणीबाबत केंद्रस्तरावरही समिती पाठपुरावा करेल. कोल्हापूर टर्मिनस आहे. या ठिकाणाहून दररोज दहा ते पंधरा रेल्वेगाडय़ा धावतात. पंधराहजारहून अधिक प्रवासी असतात. त्यामुळे या ठिकाणी अद्ययावत सर्व सुविधा असाव्यात यासाठी समिती आग्रही आहे. कोल्हापूरचे रेल्वे स्टेशन ए ग्रेडमध्ये यावे, यासाठी आमचे प्रयत्न राहतील, असेही छोटूभाई पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी रेल्वेचे एडीआरएम ब्रिजेश सिंग, डीसीएम शाम कुलकर्णी, कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक विजयकुमार, महाराष्ट्र रेल्वे व रोड पॅसेंजर असोसिएशनचे शिवनाथ बियाणी, अरिहंत जैन फौंडेशनचे अध्यक्ष जयेश ओसवाल, सुजाता गोयल, डॉ. अश्विनी माळकर उपस्थित होते.
कोल्हापूर संवेदनशील, स्टेशनवरील सुरक्षेत वाढ
कोल्हापूर शहर संवेदनशील आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याची गरज आहे. सध्या जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. ते पुरेसे नाहीत. त्यामध्ये वाढ करण्याच्या सूचना करण्यात आल्याचे खासदार छोटूभाई पाटील यांनी स्पष्ट केले.