सामाजिक कायकर्ते बाळासाहेब देसाई यांचा इशारा : उचगाव येथे कमानी संदर्भात बैठक
वार्ताहर / उचगाव
संपूर्ण सीमाभागात मराठी भाषिक गुण्यागोविंदाने नांदत असताना या ठिकाणी कर्नाटक शासन मात्र जाणून-बुजून मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण करून अन्याय करत असेल तर मराठी जनता कदापीही गप्प बसणार नाही. जर उचगावच्या प्रवेशभागातील फलकावर 40/60 याप्रमाणे अक्षरे हवी असतील तर सरकारी कार्यालयावरील जेवढे फलक आहेत ते सुद्धा या प्रमाणे करावे. एकीकडे निवडणूक आलेली असताना निवडणूक परिपत्रके मात्र मराठी आणि कन्नड भाषेत देण्याचे कट-कारस्थान हेच कर्नाटक शासन करीत असते. मात्र जर मराठी भाषिकांना जाणून-बुजून डिवचण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा खणखणीत इशारा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देसाई यांनी दिला.
उचगाव मध्यवर्ती गणेश मंदिरात गुरुवार दि. 21 जुलै रोजी ग्रामपंचायत अध्यक्ष जावेद जमादार यांच्या अध्यक्षतेखाली येथील कमानी संदर्भात बैठक झाली. यावेळी जिल्हा पंचायत अधिकारी बसवराज आणि तालुका पंचायत सीईओ राजेश दनवाडकर, काकती पोलीस स्टेशनचे सीपीआय गुरुनाथ, ग्रामपंचायतचे पीडीओ वासुदत्त हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना तालुका पंचायतचे माजी अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर म्हणाले गेल्या तीन-चार वर्षापासून या ठिकाणी हा फलक उभारलेला आहे. मात्र अलिकडे चार महिन्यांमध्ये कन्नड संघटनांना याचे पोटशुळ उठल्याचे दिसून येत आहे. जाणून-बुजून येळ्ळूरच्या महाराष्ट्र फलकानंतर आता उचगावच्या फलकावर त्यांची वक्रदृष्टी आहे. मात्र हा संपूर्ण परिसर मराठी भाषिक असून जर मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला तर मराठी जनता स्वस्त बसणार नाही. मतासाठी येणाऱया राष्ट्रीय पक्षाचे लोकप्रतिनिधी आता मूक गिळून गप्प का? असा मुद्दा उपस्थित केला. मराठी भाषिकांकडे त्यांचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. मात्र वेळ आल्यानंतर त्यांची जागा दाखवल्याशिवाय मराठी माणूस कदापी गप्प बसणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे असे ठासून सांगितले.
यावेळी एल. वाय लाळगे, अरुण जाधव, दीपक गडकरी, शरद होनगेकर आदींनी आपले विचार मांडले. यावेळी तालुका पंचायत सीईओ राजेश दनवाडकर यांनी सर्व नागरिकांची मते जाणून घेतली. आपण सदर प्रस्ताव जिल्हाधिकाऱयांकडे मांडणार आहे. यावर त्यांचे मत जाणून घेऊन निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. यावेळी बोलताना ग्रामपंचायत अध्यक्ष जावेद जमादार म्हणाले की ग्रामस्थ जो निर्णय घेतील त्या निर्णयावर ग्रामपंचायतही ठाम असून प्रशासनाने आमच्यावर दबाव आणू नये आम्ही सर्वजण ग्रामस्थांसोबत असल्याचे सांगितले. यासाठी शासनाने आमच्यावर दबाव आणू नये जनतेसोबत आम्ही कायम राहणार असल्याची त्यांनी सांगितले. यावेळी भागोजी पाटील म्हणाले की कायदा हा सर्वांसाठी सर्व जनतेच्या संरक्षणासाठी आहे. मात्र कायद्याची तरतूद जर एकाच बाजूने करण्यात आली तर हा अन्याय असून आम्ही मराठी माणसे गप्प बसणार नाही. याचे शासनाने भान ठेवावे असे स्पष्ट केले. या बैठकीला उचगाव येथील सर्व नागरिक युवक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठÎा संख्येने उपस्थित होते.