बारावीला प्रविष्ठ झालेल्या 1 लाख 18 हजार 31 पैकी 1 लाख 10 हजार 110 विद्यार्थी उत्तीर्ण; ऑनलाईन निकाल उपलब्ध : यंदाही मुलींचीच बाजी; कोल्हापूर 93.89 टक्के मिळवत विभागात प्रथम, सातारा 92.87 टक्के मिळवत व्दितीय तर सांगली 92.81 टक्के मिळवत तृतीय; 5 जूनला मूळ गुणपत्रकाबरोबर स्थलांतरचे प्रमाणपत्र मिळणार
कोल्हापूर प्रतिनिधी
पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुरूवारी बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. यामध्ये राज्याचा 91.25 टक्के तर कोल्हापूर विभागाचा निकाल 93.28 टक्के लागला आहे. गतवर्षीच्या निकालाशी तुलना करता यंदा कोल्हापूर विभागाच्या निकालात 1.79 टक्केंनी घट झाली आहे. गतवर्षी कोल्हापूर विभाग राज्यात पाचव्या स्थानावर तर यंदा दुसऱ्या स्थानावर असल्याने कोल्हापूर विभागाचा दबदबा वाढला आहे. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. 5 जून रोजी बारावीच्या मूळ गुणपत्रकाबरोबर स्थलांतर प्रमाणपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे प्रभारी अध्यक्ष महेश चोथे आणि सचिव डी. एस. पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर विभागात 1 लाख 18 हजार 031 पैकी 1 लाख 10 हजार 110 विद्यार्थी उत्तीर्ण होत 93.28 टक्के निकाल लागला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 49 हजार 776 पैकी 46 हजार 737 विद्यार्थी उत्तीर्ण झाले 93.89 टक्के निकाल असून विभागात प्रथम क्रमांक आहे. तर सातारा जिल्ह्यात 35 हजार 76 पैकी 32 हजार 578 विद्यार्थी उत्तीर्ण झाले 92.87 टक्के निकाल असून विभागात व्दितीय क्रमांक आहे. तसेच सांगली जिल्ह्यात 33 हजार 179 पैकी 30 हजार 795 विद्यार्थी उत्तीर्ण झाले 92.81 टक्के निकाल असून विभागात तृतीय क्रमांक मिळवला आहे. यंदा कोल्हापूर विभागाच्या निकालात 1.79 टक्केंनी घट झाली आहे. कोल्हापूर विभागातून 856 कनिष्ठ महाविद्यालयातील 1 लाख 18 हजार 32 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 1 लाख 10 हजार 110 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 7 हजार 921 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांची लवकरच पुर्नपरीक्षा घेतली जाणार आहे. जे विद्यार्थी गुणांवर समाधानी नसतील त्यांनी 26 मे ते 5 जून या कालावधीत गुण पडताळणीसाठी विहीत नमुन्यात प्रती विषय 50 रूपये शुल्क भरून ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे.
राज्यासह कोल्हापूर विभागातही मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. कोल्हापूर विभागात 62 हजार 676 पैकी 56 हजार 773 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 55 हजार 355 विद्यार्थीनींपैकी 53 हजार 337 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा मलांपेक्षा 5.77 विद्यार्थींतींचे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. या निकालासंदर्भात विद्यार्थ्यांची तक्रार असल्यास त्यांनी कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष महेश चोथे आणि सचिव डी. एस. पोवार यांनी केले आहे. यावेळी कोल्हापूर विभागीय मंडळाचे सहाय्यक सचिव संजय चव्हाण, लेखाधिकारी निवृत्ती पाटील, सातारा माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, सांगली उपशिक्षणाधिकारी पोपट मलगुंडे, मंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोल्हापूर विभागातील 2 हजार 258 खेळाडूंना सवलतीचे गुण
बारावी परीक्षेला बसलेल्या खेळाडूंना नियमांच्या अधीन राहून सवलतीचे गुण देण्यात आले आहेत. यामध्ये सांगली 681, सातारा 473, कोल्हापूर 1 हजार 5 अशा 2 हजार 258 विद्यार्थ्यांना क्रीडाचे सवलतीचे गुण देण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा समावेश आहे.