केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन मंत्रालय पर्यटन क्षेत्र बळकट करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे. पर्यटन आणि हॉटेल उद्योगाच्या प्रतिनिधींशी आणि भागदारांबरोबर विशेषतः देशी पर्यटनच्या प्रसार आणि प्रचाराद्वारे पर्यटन व्यवसाय वाढविण्याच्या हेतूने पर्यटन मंत्रालय सतत संपर्कात आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.
येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल लीडरशिप परिषदेत प्रमुख पाहुणे या नात्याने केंद्रीय मंत्री नाईक उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपिठावर ग्लोबल लीडर फाऊंडेशनचे अध्यक्ष रमेश त्रिपाठी, कर्नाटकचे आमदार बॅली प्रकाश, साऊथ कॅनरा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँक, कर्नाटकचे अध्यक्ष एन. एन. राजेंद्र कुमार, डॉ. ए. आर. नासिर आदी मान्यवर उपस्थित होते.
सध्या देशात देशी पर्यटन तेजीत आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार, बहुतांश पर्यटन स्थळांमधील हॉटेल्स भरलेली आहेत. कठीण काळात देशी पर्यटनाने पर्यटन क्षेत्र सावरण्यात प्रमुख भूमिका बजावलेली आहे. बाहेरून येणाऱया पर्यटकांची संख्या कमालीची घटलेली असताना देशी पर्यटनाने पर्यटन क्षेत्राला मदतीचा हात दिला, असे मंत्री नाईक यांनी नमूद केले.
‘इमर्जिंग ट्रण्डस्इन ग्लोबल डॅव्हलपमेन्ट’ हा ग्लोबल लीडरशिप परिषदेचा विषय होता. रमेश त्रिपाठी, बॅली प्रकाश, डॉ. एम. एन. राजेंद्र कुमार, आय.एन.एच. ए. विद्यापीठ, दक्षिण कोरिया आणि उझबेकीस्थानचे डीन डॉ. नासिर, जवाहरलाल नेहरू ट्रॉपिकल बॉटनिकल गार्डन अँड रीसर्च इंस्टिटय़ूट, केरळचे निवृत्त वैज्ञानिक डॉ. राधाकृष्णन के. ऋषिकूल विद्यापीठ, हरयाणाच्या डीन प्रा. मंकिया वालिया, महाराजा रंजित सिंग ग्रुप ऑफ इंस्टिटय़ूट, इंदोरच्या संचालिका डॉ. ईरा बापना, रावेनशॉ विद्यापीठ, कटकच्या डॉ. संहिता पाधी, किंग जॉर्ज मेडिकल विद्यापीठ, लखनौचे प्राध्यापक डॉ. ओ. पी. सिंग व प्राध्यापक डॉ. व्हि. के. सिंग यांची विविध विषयांवर यावेळी भाषणे झाली. केंद्रीय मंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.