पुणे / प्रतिनिधी :
The withdrawal of monsoon will begin in the next three days परतीच्या पावसाला येत्या तीन दिवसांत सुरुवात होण्याची शक्यता आहे. राजस्थानातून मान्सूनच्या माघारीच्या दृष्टीने अनुकूल वातावरण तयार होत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
यंदा देशात मान्सूनचे आगमन नियोजित वेळेआधीच झाले. मात्र, त्यानंतर त्याच्या प्रवासात अडथळे आले. त्यामुळे जूनमध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही. जुलै व ऑगस्टमध्ये देशाच्या विविध भागांत दमदार पावसाची नोंद झाली. तर सप्टेंबरमध्यही सर्वदूर पावसाचा धूमधडाका दिसून येत आहे. आता रिटर्न मान्सूनला कधी सुरुवात होणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. साधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. यंदा मात्र, विलंबानेच त्याचा प्रवास सुरू होत असल्याचे पहायला मिळत आहे. वायव्य भारताच्या काही भागात नैऋत्य मोसमी पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे मान्सूनच्या परतीचा प्रवास आता लवकरच सुरू होणार, हे निश्चित आहे.
अधिक वाचा : अस्तित्व नसल्यानेच काँग्रेसचा प्रत्येक गोष्टीला विरोध, देवेंद्र फडणवीस यांचा पटोलेंवर पलटवार
परतीच्या मान्सूनबाबत उत्सुकता
यंदा देशात हंगामात 103 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. तर सप्टेंबरमध्ये 109 टक्के पावसाचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. एकूणच हंगामाचा विचार करता देशात सर्वत्र दमदार पाऊस झाल्याचे दिसून येत आहे. परतीच्या प्रवासातही काही भागांत जोरदार पाऊस होत असतो. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भासारख्या भागाला अनेकदा परतीच्या मान्सूनने चांगलेच झोडपून काढल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे यंदा परतीचा पाऊस कसा राहणार, याबाबत उत्सुकता आहे.