जोरदार पावसाची शक्यता असल्याने सामना होण्यात अडचण
वृत्तसंस्था/ मेलबर्न
येत्या रविवारी येथे टी-20 विश्वचषक स्पर्धेची अंतिम लढत इंग्लंड व पाकिस्तान यांच्यात होणार असून या सामन्यावर पावसाचे सावट पडले आहे. हवामान खात्याने 13 नोव्हेंबर रोजी येथे पाऊस होणार असल्याचा 95 टक्के अंदाज वर्तविला आहे.
जगभरातील क्रिकेटशौकीन या अंतिम लढतीसाठी उत्सुक झाले असताना त्यांच्या उत्साहावर विरजण टाकणारी ही बातमी आहे. या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला असल्याने रविवारी खेळ न झाल्यास सोमवारी सामना खेळविला जाऊ शकतो किंवा विजेतेपद दोन्ही संघांना विभागून दिले जाऊ शकते. रविवारी पाऊस पडण्याची खात्री असून दिवसभरात 8 ते 20 मिलिमीटर पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
‘अतिशय ढगाळ वातावरण असून सकाळी व दुपारी वादळी वाऱयासह जोरदार पाऊस होण्याची दाट (शंभर टक्केच) शक्यता आहे. हवाही त्या दिशेने वाहत आहे,’ असे ऑस्ट्रेलियातील ब्युरो ऑफ मेटरॉलॉजीने शुक्रवारी भाकीत केले आहे. सोमवार हा या सामन्यासाठी राखीव दिवस असला तरी त्या दिवशीही आशादायक वातावरण नसून तेव्हाही वादळी वाऱयासह पाऊस होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद दिले जाऊ शकते.
या स्पर्धेत सुपर 12 फेरीतील काही सामन्यांनाही पावसाचा फटका बसला होता. पावसामुळे किमान दोन सामने एकाही चेंडूचा खेळ न होता रद्द करावे लागले होते. त्यामुळे अंतिम लढतीची स्थितीही अशीच होण्याची शक्यता आहे. तसे पाहिल्यास यावेळची टी-20 विश्वचषक स्पर्धा आजवरच्या सर्वोत्तम स्पर्धेपैकी एक मानली जात आहे. या स्पर्धेत अनेक अनपेक्षित निकाल पहावयास मिळाले तर काही वेळा नाटय़मय वळणेही पहावयास मिळाली.
या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरी गाठली तर इंग्लंडने बटलर व हेल्स यांच्या धडाकेबाजा फलंदाजीच्या बळावर भारतावर 10 गडय़ांनी एकतर्फी विजय मिळवित अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे.