कुडाळ / प्रतिनिधी :
होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या बाधितांनी नियमांची पायमल्ली केल्याने पार्टेवाडी, खर्शी बारामुरे या ६० घरांची वाडी बाधितांचे आश्रयघर बनले असून, बाधित रुग्ण प्रत्येक घरी आढळून येत असल्याने बाधितांची संख्या 33 वर पोहोचली आहे. बाधितांनी होम आयसोलेशनमध्ये न राहता ग्रामस्तरीय विलगीकरण केंद्रात राहण्याच्या सूचना जावळीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी केल्या आहेत.
पार्टेवाडी, (खर्शी बारामुरे ता. जावली ) 60 उंबराचं व साडेतीनशे लोकवस्तीच्या वाडीत 33 बाधित रुग्ण झाले असून, प्रत्येक घरटी बाधितांचा आकडा वाढत आहे. लक्षणे असूनही अंगावर दुखणे काढण्याचा अट्टहास तसेच नियमांना कोलदांडा देत गावभर फिरण्याने रुग्ण आढळून येत आहेत आणि प्रशासन घालून दिलेल्या नियमांना ग्रामीण लोक डावलत असल्याने ग्रामीण भागात कोरोना फैलाव अधिकच वाढत आहे.
ग्रामीण भागातील बाधित नियमांची पायमल्ली करीत असल्याने शासनाने होम आयसोलेशन बंद केले आहे. येथील बाधितांनी आरोग्य प्रशासनाने ग्रामस्तरीय विलगीकरण केंद्रात राहण्याच्या सूचना केल्या आहेत. या सूचनांचे बाधितांनी पालन न केल्यास या बाधितांना रायगाव येथील विलगीकरण कक्षात ठेवण्याचा विचार आरोग्य विभाग करीत आहे.