पोलिसांकडून कारवाईला सुरूवात, 41 जणांना दंड : शहरातील मध्यवर्ती भागातील नवीन भाजी मंडईचे ड्रोनने घेतलेले छायाचित्र.
प्रतिनिधी / कराड
कोरोनामुळे जिल्हाधिकाऱयांनी अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांच्या वेळा ठरवून दिल्या आहेत. कराड शहरात सकाळी अकराच्या ठोक्याला नियमाप्रमाणे दुकानांचे शटर डाऊन होत आहेत. तर 11 वाजून 10 मिनिटांनी पोलिसांकडून रस्त्यावर दिसणारांवर कारवाई केली जात आहे. सोमवारी पोलिसांनी 41 जणांवर कारवाईचा बडगा उगारला.
कोरोनाच्या संकटामुळे संचारबंदी लागू आहे. गेल्या 20 दिवसांपासून जिल्हय़ासह कराड, मलकापूर शहरात संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर कारवाई होताना दिसत आहे. मात्र अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू असल्याने बरेच लोक त्या नावाखाली दिवसभर फिरत होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने केवळ सकाळी 8 ते 11 व सायंकाळी 7 ते 9 या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या चार दिवसांपासून हा नव्या नियमाप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. सोमवारी सकाळी 8 वाजता भाजीपाल्याची दुकाने, किराणा दुकाने, मेडिकल सुरू झाली होती. त्यामुळे रस्त्यांवर वर्दळ वाढलेली दिसत होती. पोलिसांनी काही रस्त्यांवरील बॅरिकेट खुली करून लोकांना वाट करून दिली होती. कोल्हापूर नाक्यावर वाहनांची मोठी रांग लागलेली होती. शहरात येणाऱया वाहनांची संख्या जास्त होती. शहरातील रस्त्यांवरही दुचाकीवरून ये जा करणारांची वर्दळ होती. दुकानांच्या बाहेर गर्दी झालेली होती. या लगबगीत 11 वाजले. बरोबर 11 वाजता दुकानदारांनी शटर बंद केली तर भाजीपाला व्यावसायिकांनी दुकाने गोळा करण्यास सुरूवात केली. 11 वाजून 15 मिनिटांपर्यंत रस्त्यांवरून लोकांना फिरून दिले जात होते. मात्र बरोबर 11.15 वाजता पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली. कोल्हापूर नाक्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. वाहनांवर कारवाईला सुरूवात झाली. भेदा चौकात वाहतूक शाखेचे विकास बडवे यांनी वाहनांवर कारवाई सुरू केली. विजय दिवस चौकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी ग्रुप कॉलवरून प्रत्येक चौकातील पोलिसांशी संपर्क साधून कारवाईच्या सूचना दिल्या. अवघ्या एका तासात 41 जणांवर कारवाई करण्यात आली.