दुसरी कसोटी दुसरा दिवस : भारत 82 धावांनी आघाडीवर
वृत्तसंस्था/ मेलबर्न
हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेने कप्तानी खेळी करीत नोंदवलेले नाबाद शतक आणि अष्टपैलू रवींद जडेजासमवेत नोंदवलेल्या अभेद्य शतकी भागीदारीमुळे दुसऱया कसोटीच्या दुसऱया दिवशी भारताने ऑस्ट्रेलियावर 82 धावांची आघाडी मिळविली. याशिवाय रहाणेने हनुमा विहारी आणि ऋषभ पंत यांच्यासमवेतही अर्धशतकी भागीदारीही नोंदवल्या.
चार सामन्यांच्या या मालिकेत भारत 0-1 असे पिछाडीवर असून भारताने दुसऱया दिवशीअखेर 5 बाद 277 धावा जमविल्या. पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चमकदार प्रदर्शन करीत यजमान ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांत गुंडाळला होता. पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱया दिवसाचा खेळ थांबविण्यात आला तेव्हा रहाणे 104 व जडेजा 40 धावांवर खेळत होते. सहाव्या गडय़ासाठी या दोघांनी अभेद्य शतकी भागीदारी नोंदवली असून ती निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. रहाणेचे हे 12 वे कसोटी शतक असून एमसीजीवरील दुसरे शतक आहे. 2014 च्या दौऱयात त्याने या मैदानावर 147 धावांची खेळी केली होती. त्याला 73 धावांवर दुसऱया स्लिपमध्ये नव्या चेंडूवर स्टार्कच्या गोलंदाजीवर जीवदान मिळाले. त्याने प्रारंभी सावध खेळ केला आणि पूर्ण स्थिरावल्यानंतर त्याने काही आक्रमक चौकारही ठोकले. हॅझलवुडला त्याने पुलचा चौकार मारल्यानंतर कमिन्सला ऑफड्राईव्ह करीत चौकार ठोकला. दिवसातील त्याचे हे दोन दर्जेदार फटके होते.
पहिल्या दिवशी गोलंदाजीत अचूक बदल करून नेतृत्वातील चमक दाखविल्यानंतर रहाणेने फलंदाजीतही तशीच चमक दाखविली. संघाच्या नाजूक स्थितीनंतर त्याने दोन जीवदानांचा लाभ घेत संयमी शतक नोंदवून संघाला प्रथम सावरले आणि नंतर आघाडीही मिळवून दिली. ‘ऑस्ट्रेलियाच्या दर्जेदार वेगवान गोलंदाजीसमोर खेळताना संयमाची गरज असते. तसाच खेळ अजिंक्यभाईने आज केला. खराब चेंडूची प्रतीक्षा करीत कठीण स्थितीवर कशी मात करावी, हेच त्याच्या या खेळीतून शिकण्यासारखे आहे,’ असे शुभमन गिल म्हणाला. नवा चेंडू घेतल्यानंतरचा काळ दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता आणि या अवधीत भारताने एकही बळी गमविला नाही. त्यामुळे भारताला यजमानांवर दिवसअखेर धावांच्या बाबतीत आणि मानसिक दृष्टिकोनातूनही वर्चस्व मिळविता येणे शक्य झाले. शतक पूर्ण झाल्यावर त्याला गलीमध्ये बदली खेळाडू ट्रव्हिस हेडकडून आणखी एक जीवदान मिळाले. रहाणेच्या खेळात संयमावर जास्त भर होता, त्यात नजाकत नव्हती, आक्रमकता नव्हती. तरीही त्याचे हे सर्वोत्तम शतकांपैकी एक शतक मानले जाईल. मायदेशी परतलेला कर्णधार विराट कोहली, माजी खेळाडू सेहवाग, इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉन, रिकी पाँटिंग यांनीही रहाणेच्या शतकाची प्रशंसा केली आहे.
भारताने 1 बाद 36 या धावसंख्येवरून दुसऱया दिवसाच्या खेळास सावध प्रारंभ केला. पदार्पणवीर गिल व अनुभवी पुजारा 11 चेंडूंच्या फरकाने बाद झाल्यानंतर भारताने उपाहारापर्यंत 3 बाद 90 अशी मजल मारली होती. 21 वर्षीय गिलने सफाईदार फलंदाजी करीत 45 धावांचे योगदान देताना काही शानदार फटकेही लगावले. 65 चेंडूंच्या खेळीत त्याने 8 चौकार मारले तर पुजाराने 70 चेंडूत 17 धावा जमविल्या. कमिन्स गोलंदाजीवर पेनने झेल टिपत गिलची खेळी संपुष्टात आणल्यानंतर पुजारालाही कमिन्सनेच बाद केले. सूर मारत पेनने त्याचा झेल टिपला. यानंतर रहाणेने हनुमा विहारी (21) व पंत (29) यांच्यासमवेत दोन अर्धशतकी भागीदारी नोंदवत संघाला सुस्थितीत आणले. विहारीसमवेत त्याने चौथ्या गडय़ासाठी 52 तर पंतसोबत पाचव्या गडय़ासाठी 57 धावांची भागीदारी केली. विहारी व पंत यांना चांगली सुरुवात करूनही त्याचा त्यांना लाभ घेता आला नाही. विहारीला ऑफस्पिनर लियॉनने स्वीपच्या जाळय़ात पकडले तर पंतने क्षेत्ररक्षकांचे कडे असतानाही आत्मविश्वासाने निर्भयपणे फटके मारले.
स्टार्कचे अडीचशे बळी
रहाणे बचावात्मक खेळाने यजमानांचा मारा बोथट करीत होता तर पंतने आक्रमक फटकेबाजी केल्याने ऑस्ट्रेलियाला डावपेचात बदल करणे भाग पडले. पण पंत स्टार्कच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पेनचा हा यष्टीमागील 150 वा बळी होता तर स्टार्कचा 250 वा बळी होता. स्टार्क हा सर्वात कमी कसोटीत (59) हा टप्पा गाठणारा पाचव्या क्रमांकाचा ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहे. यापूर्वी डेनिस लिली यांनी 48 कसोटीत हा ऑस्ट्रेलियन विक्रम केला होता. दिवसातील पहिल्या सत्रात भारताने फक्त 54 धावांची भर घातली तर दुसऱया सत्रात 99 धावा वसूल केल्या. जडेजाने नंतर रहाणेला चांगली साथ देत शतकी भागीदारी नोंदवली. भारताला मोठी आघाडी घेण्याची संधी असून रहाणे-जडेजा यांना यासाठी पुन्हा जबाबदारी घ्यावी लागणार आहे.
टिम पेनचे सर्वात जलद 150 बळी !
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार व यष्टिरक्षक टिम पेनने कसोटीत यष्टीमागे जलद 150 बळी मिळविण्याचा टप्पा गाठला आहे. 33 कसोटी डावांत त्याने हा माईलस्टोन गाठताना द.आफ्रिकेच्या क्विन्टॉन डी कॉकचा 34 डावांत हा टप्पा गाठण्याचा विक्रम मागे टाकला. ऑस्ट्रेलियाच्याच ऍडम गिलख्रिस्टने यासाठी 36 तर दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाऊचरने 38 डाव घेतले होते.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प.डाव 195, भारत प.डाव 91.3 षटकांत 5 बाद 277 : अगरवाल 0, शुभमन गिल 45 (65 चेंडूत 8 चौकार), पुजारा 17 (70 चेंडूत 1 चौकार), अजिंक्य रहाणे खेळत आहे 104 (200 चेंडूत 12 चौकार), हनुमा विहारी 21 (66 चेंडूत 2 चौकार), पंत 29 (40 चेंडूत 3 चौकार), जडेजा खेळत आहे 40 (104 चेंडूत 1 चौकार), अवांतर 21. गोलंदाजी : स्टार्क 2-61, कमिन्स 2-71, लियॉन 1-52, ग्रीन 0-31, हॅझलवुड 0-44.