महाद्वार चौकातील कारवाईस फेरीवाल्यांचा विरोध
प्रचंड तणाव : आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिली भेट
प्रतिनिधी / कोल्हापूर
महाद्वार चौकात अतिक्रण हटविण्यासाठी आलेल्या अतिक्रमण निर्मूलन पथकास येथील फेरीवाल्यांनी विरोध केला. तर पथक कारवाईवर ठाम राहिल्याने येथे प्रचंड तणाव निर्माण झाला. आमदार चंद्रकांत जाधव यांनी घटनास्थळी भेट देत फेरीवाला, प्रशासन यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी शनिवारी कारवाई संदर्भात बैठक घेण्यावर एकमत झाले. यामुळे कारवाईस तुर्तास बेक मिळाला. बैठकीनंतर कारवाई संदर्भात निर्णय होईल, मात्र प्रशासन मंदिरापासून शंभर मीटर अंतरावरील अतिक्रमण हटविण्यावर ठाम आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. 11) येथील फेरीवाल्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
अंबाबाई मंदिरापासून शंभर मीटर अंतरावरील फेरीवाले, अतिक्रमण हटविण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार महाद्वार चौकासह रोडवरील अतिक्रमण हटविण्यात येत आहे. मात्र सोमवारपासून या करावाईवरुन केवळ तणावपूर्ण वातवरणच तयार होत आहे. कारवाईला विरोध म्हणून गेल्या तीन दिवसांपासून येथील फेरीवाल्यांनी व्यवसाय बंद ठेवला आहे. महापालिकेचे पथक कारवाईसाठी येथे दाखल होते, फेरीवाले त्यांना विरोध दर्शवितात, तणावपूर्ण वातावरण तयार होते. मात्र पुढे कोणतीच हालचाल होत नाही, असे चित्र गेल्या तीन दिवसांपासून येथे आहे.
बुधवारी सकाळीही अतिक्रमण निर्मूलन पथक महाद्वार चौकात दाखल झाले. फेरीवाल्यांनी त्यांना विरोध केला. पथक प्रमुख पंडीत पोवार यांनी फेरीवाल्यांशी चर्चा करत त्यांनी तारबाई रोडवर आखलेल्या पट्ट्यांमध्ये बसून व्यवसाय करण्याबाबत सूचना केली. मात्र फेरीवाल्यांनी येथून हालणार नाही अशी भुमिका घेतली. तर पथकाने येथे व्यवसाय केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. यामुळे येथील वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनले. फेरीवाल्यांनी व्यवसाय बंद ठेवत महाद्वार चौकातच ठाण मांडले.
यानंतर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत येथे आले. त्यांनीही फेरीवाल्यांशी चर्चा केली. मात्र फेरीवाले महाद्वार चौकातून न हटण्यावर ठाम राहिले. तर प्रशासनही कारवाईवर ठाम होते. त्यामुळे प्रशासन आणि फेरीवाला यांच्यामध्ये बराच वेळ रस्त्यावरच चर्चा सुरु होती. फेरीवाल्यांची बाजू मांडताना किरण गवळी, नजीर देसाई, समीर नदाफ, अविनाश उरसाल यांनी प्रशासनाने फेरीवाल्यांशी चर्चा करावी, कारवाई संदर्भात चर्चेतून मार्ग काढावा, अशी मागणी केली. मात्र प्रशासन शंभर मीटरवरील अतिक्रमण हटविण्यावर ठाम राहिले. त्यामुळे बर्याच सुरु असलेल्या चर्चेतूनही मार्ग निघला नाही.
आमदार चंद्रकांत जाधव यांची भेट
आमदार चंद्रकांत जाधव यांनी दुपारी अडीच वाजता घटनास्थळी भेट दिली. प्रशासन, फेरीवाले यांच्याशी चर्चा केली. प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. शनिवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्याची मागणी केली. प्रशासनाने बैठकीबाबत सकारात्मकता दर्शविली. यानंतर जाधव यांनी ताराबाई रोडवर महापलिकेने मारलेल्या पट्ट्यांची पाहणी केली. यानंतर येथील तणावपूर्ण वातावरण काहिसे निवळले.
नोंदणीकृती फेरीवाल्यांशी समिती बांधिल
चर्चेमधून मार्ग काढण्याची मागणी फेरीवाल्यांनी केल्यानंतर शहर अभियंता सरनोबत यांनी चर्चा कितीवेळा करायची. अद्याप किती फेरीवाल्यांची नोंदणी झाली, वेळ देवूनही नोंदणी केलेली नाही. शहरात 12 हजार फेरीवाले आहेत. यापैकी 5 हजार 600 फेरीवाल्यांची नोंद असल्याचे सांगितले. यावेळी संघटनांच्या पदाधिकार्यांनी नोंदणीकृत फेरीवाल्यांशी समिती बांधिल आहे. नोंदणी न केलेल्या फेरीवाल्यांची दखल समिती घेणार नाही. त्यांच्या प्रशासनाने कारवाई केल्यास समिती हस्तक्षेप करणार नसल्याचे पदाधिकार्यांनी सांगितले.