वार्ताहर/ अथणी
गतवर्षी झालेली अतिवृष्टी व महापुरामुळे अथणी तालुक्यातील रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसला असून शेतकरी संकटात सापडला आहे. राज्य शासकडून शेतकरी व पूरग्रस्तांना मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र अद्यापही शासनाकडून मदत निधी मिळाला नसल्याने तालुक्यातील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
तालुक्यातील उत्तर व पूर्व भागातील शेतकरी दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटात सापडत असतो. गतवर्षी अतिवृष्टीमुळे रब्बी पीक तसेच हातातोंडाला आलेले द्राक्ष पीक उद्ध्वस्त झाले. यामुळे शेतकरी हबकून गेला आहे. महसूल व कृषी खात्याच्यावतीने नुकसानीचा सर्व्हे करण्यात आला. मात्र अद्याप मदत न मिळाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
संबरगी, अरळहट्टी, शिरुर, पांडेगाव, खिळेगाव, अनंतपूर, शिवनूर, कलोती या भागातील शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय ग्रामीण भागात गत सहा महिने रोजगार हमी योजनेतील पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी व मजूर वर्गावर आर्थिक संकट ओढावले आहे. सरकारने याकडे वेळीच लक्ष देऊन पीक नुकसानभरपाई व रोजगार हमी योजनेचे वेतन देणे गरजेचे आहे.