प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर हे मुळात ऐतिहासिक राजधानी म्हणून प्रसिध्द आहे. मात्र या ऐतिहासिक शब्दाचा दबदबा कायम रहावा, सातारा शहर स्वच्छ, सुंदर असावे ही घोषणा वर्षानुवर्षे कागदावरच राहते. अनेक गोष्टी कागदोपत्री रंगवल्या जातात आणि मग त्यातूनच खाबुगिरीची लक्तरे ऐन कोरोनास्थितीत निघाली अन सातारकर अवाक झाले आहेत. अधिकारी, ठेकेदार अन सत्ताधारी यांच्यातील अभद्र युतीने सातारा विकासाच्या बाबतीत खड्डय़ात गेला आहे याची चाड यापुढे शहराच्या विकासाची स्वप्ने पाहणाऱयांना ठेवावी लागणार आहे. सध्या पालिका लाचखोरी अन कार्यालयात मारामारीमुळे चर्चेत आली आहे.
सातारा नगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱयासह दोन आरोग्य विभागातील कर्मचारी लाखो रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडले आणि एकच खळबळ उडाली. पालिकेच्या दालनातून सातारचा विकास व्हावा म्हणून कार्यरत असल्याचा कळवळा आणणारे अधिकारी अन ठराविक सत्ताधारी यात गुंतलेले असल्याचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आणि अगदी मुख्याधिकाऱयांच्या पाच टक्क्यांसह सगळय़ांची टक्केवारी सातारकरांना ऐकवली गेली.
त्यानंतर नगराध्यक्षांसह माजी नगराध्यक्षांनी पत्रकबाजी सुरु करुन कितीही त्याबाबत मते व्यक्त केली तरी भ्रष्टाचाराचे हे ग्रहण अनेक वर्षांपासून लागलेले असून आता फक्त एका ठेकेदारामुळे ते जाहीररित्या उघड झाल्याने त्याचा सातारकरांसमोर पर्दाफाश झाला एवढेच. यामध्ये ज्यांनी लाचखोरी केली त्यांना कायदा शिक्षा देईलच पण जे काही टक्केवारीचे आकडे समोर आले त्या सर्वांना यापुढे तरी थोडी नीतीमत्ता बाळगली पाहिजे, अशी भावना समाज मनातून व्यक्त झाली.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांना सातारा पालिकेतील एका ठेकेदाराने सोमवारी दुपारी मारहाण केल्याने शहरासह जिह्यात खळबळ उडाली होती. या घटनेचे तीव्र पडसाद शहरात पहावयास मिळाले. मात्र, नरेंद्र पाटील यांना झालेल्या मारहाणीनंतर काहींनी तीव्र नाराजी व्यक्त केली, तर काहींनी दबक्या आवाजात ‘बरं झालं, हे अगोदरच व्हायला हवं होतं’, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. याचा अर्थ कोणच आलबेल नव्हतं व नाही हे यानिमित्ताने समोर आलेय.
सातारा पालिकेत टक्केवारीचा मोठा खेळ चालतो, अशी दबक्या आवाजात चर्चा होती. काल दि. 15 जून रोजी याच टक्केवारीच्या भानगडीतून पालिकेच्या बांधकाम विभागातच बांधकाम ठेकेदार गणेश पवार, सचिन बनसोडे यांची नरेंद्र पाटील यांच्याबरोबर शाब्दिक खडाजंगी झाली. सातारा शहरात सुरु असलेल्या रोड पॅचिंगचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे, अशी तक्रार नरेंद्र पाटील यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱयांकडे केली होती. परंतू नरेंद्र पाटील यांनीच कामाचे बिल मिळवायचे असेल तर त्या बदल्यात पैशाची मागणी केली होती. याच वादातून शाब्दिक खडाजंगी, हातघाई व नंतर बुकलाबुकलीचा कार्यक्रम काल दुपारी सातारा पालिकेत पार पडला त्याने साताऱयाचा बदलौकिक झाला. अधिकारी, ठेकेदार आणि सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांना या घटनेतून बोध घेतला पाहिजे.
कधीतरी बिनटक्केवारीचा विकास होवूद्या
सातारा हे जिह्याचे मुख्यालय. परंतू विदर्भातील शहरांना लाजवतील, असे रस्ते सातारा शहरात आहेत. दोन खासदार, बारा आमदार आणि दोन मंत्री जिह्याचे प्रतिनिधीत्व करतात. तरीसुद्धा सातारचे मुलभूत प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. काल घडलेला नेमका प्रकार काय? याबाबत सातारा शहरात मोठय़ा चवीने चर्वण सुरु आहे. दोघांनी परस्परविरोधी दिलेल्या तक्रारींमुळे पोलिसांचे नसले तरी लोकांचे मनोरंजन होत आहे. काय खरं आणि काय खोटं, हे समजायला सातारकर निश्चितच सुज्ञ आहेत. कधीतरी बिनटक्केवारीचा विकास करा हीच त्यांची भावना आहे हे आता समजून घ्या.