रस्त्याचे उर्वरित काम संथगतीने करण्यात येत असल्याने परिसरातील रहिवासी-व्यावसायिकांचे हाल
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अनगोळ मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. याकरिता गटारीच्या दोन्ही बाजूने सांडपाणी वाहण्यासाठी पाईप घालण्याचे काम करण्यात आले आहे. पण उर्वरित कामे संथगतीने करण्यात येत असल्याने परिसरातील रहिवासी आणि व्यावसायिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे परिसरातील कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी होत
आहे.
अनगोळ नाका ते छत्रपती संभाजी चौक अनगोळपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण स्मार्ट सिटी योजनेंमधून करण्यात आले आहे. सांडपाणी वाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गटारीच्या ठिकाणी पाईप घालण्याचे काम करण्यात आले आहे. पण सध्या हे काम करण्यासाठी ठिकठिकाणी रस्त्याची खोदाई करण्यात आली होती. रस्त्यावर मातीचे ढिगारे असल्याने वाहनधारकांना ये-जा करण्यास अडचण होत आहे. व्यावसायिकांना आणि रहिवाशांना अडचणीचे ठरले आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहे. तरीही काम पूर्ण करण्याच्यादृष्टीने कोणत्याच हालचाली सुरू नाहीत. रस्त्याच्या काँक्रिटीकरणानंतर दुतर्फा साईटपट्टय़ांचे काम पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. पण याकडे पूर्णपणे कानाडोळा करण्यात आला आहे. हा मुख्य मार्ग असल्याने रस्त्यावर विविध रुग्णालये व व्यावसायिक आस्थापने आहेत. मागील वर्षभरापासून काम सुरू असून रस्त्यावरील अडथळय़ांमुळे वाहनधारकांचे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पण या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची तसदी स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांनी व कंत्राटदारांनी घेतली नाही. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वाहनधारकांना अडथळा येथील अंतर्गत रस्त्याचे काम करण्यात येत आहे. पण मुख्य रस्त्याचे काम अर्धवट असल्याने रस्त्यावर अडथळय़ांमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नागरिकांची गैरसोय हेत आहे. सदर रस्त्याचे काम वर्षभरापासून सुरू असून रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. पावसाळय़ात पाणी साचून वाहनधारकांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.