दोन तास वाहतूक पूर्णपणे ठप्प, नागरिकांची तारांबळ
प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट अचानक नादुरुस्त झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी 9.45 च्या सुमारास झाला. सकाळच्यावेळी गेट बंद झाल्याने गेटच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. यामुळे नागरिकांना दुसऱया व तिसऱया रेल्वेगेटमार्गे प्रवास करावा लागल्याने कामावर पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.
शनिवारी सकाळी रेल्वे निघून गेल्यानंतर गेट उघडताना तार तुटली. यामुळे गेट उघडले गेले नाही. सकाळच्या सत्रात वडगाव, अनगोळ, शहापूर, येळ्ळूर या परिसरातील नागरिक उद्यमबाग येथे कारखान्यांमध्ये जातात. परंतु गेट बंद असल्याने त्यांची धावपळ झाली. पुन्हा माघारी फिरून तिसऱया रेल्वेगेटमार्गे उद्यमबाग येथे पोहोचावे लागले. दोन तास लागून रेल्वे कर्मचाऱयांनी या गेटची दुरुस्ती केल्यानंतर रेल्वेगेट उघडण्यात आले. परंतु यामुळे नागरिकांचे मात्र पुरते हाल झाले. या रेल्वेगेटवर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.