अनाथांची माय म्हणून सर्वदूर परिचित असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचे मंगळवारी रात्री पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आणि नऊवारी साडी, खणखणीत कुंकू, डोक्यावर पदर आणि जिभेवर साखर ठेऊन अनाथांसाठी पदर पसरणारी आणि अनाथ मुलांना जीवनात उभी करणारी माय काळाआड गेली. पुण्यात खासगी रुग्णालयात हर्नियावरील शस्त्रक्रिया करुन घेण्यासाठी त्या उपचार घेत होत्या. दरम्यान त्यांना हृदयविकाराने गाठले. स्मशानभूमीतील आगीवर भाकरी भाजून जगणारी ही माय पद्मश्री किताबाने गौरवली गेली आणि तिने वाढवलेली मुले डॉक्टर, इंजिनियर, वकील झाली. ती अनेकांची आज्जी झाली. दुःखातून, वेदनेतून, भूकेतून प्रेरणा घेऊन किती मोठे काम उभे राहू शकते याचा सिंधूताई सपकाळ हा वस्तुपाठ आहे. संकटे अनेकांना येतात, पण ते सारे इतरांना दोष व शिव्याशाप देत असतात. पण भोगून-सोसून समाजकल्याणाचा वसा घेणारे मोजकेच विरळे असतात. सिंधूताई सपकाळ ही माय अशीच आगळीवेगळी म्हणून तिच्या जाण्याचे दुःख घराघरातून व्यक्त होत आहे. सिंधूताईचा काळ वेगळा होता. स्त्राr-मुक्तीचे उच्चार सुरु झाले होते पण स्त्राr आजच्या इतकी शिक्षित प्रगत, स्वतंत्र आणि पुढारलेली नव्हती. त्या काळात विदर्भात वर्धा जिह्यात नवरगाव येथे गरीब घरात त्यांचा जन्म झाला. गावातच जेमतेम चौथीपर्यंत शिकलेली सिंधू वयाच्या नवव्या वर्षी तिच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठय़ा मुलाशी विवाहबद्ध झाली. तिचे लग्न लाऊन देण्यात आले आणि नंतर सासरीही छळ सुरु झाला. पाठोपाठ तीन अपत्ये झाली. गुरं चरायला नेणं, राबणं आणि त्रास सोसणं नशिबी असलेल्या सिंधूताईंनी गुरं चरणाऱया महिलांना संघटीत करुन गावातील सावकाराविरोधी आवाज उठवला. त्यातून तरुण सिंधूची बदनामी सुरु झाली. पोटात बाळ असताना सिंधूताईना घराबाहेर काढण्यात आलं. सासर, माहेर आधार उरला नाही. त्यांनी गोठय़ात मुलीला जन्म दिला आणि आधार हरवलेली सिंधूताई निर्धाराने अनाथाची माय झाली. सिंधूताई रेल्वे स्टेशनवर भिक मागायच्या, रात्री स्मशानभूमित मुक्कामला रहायच्या, अंत्यसंस्काराच्यावेळी लोकांनी आणलेले पीठ, पैसे आणि सरणावरचे निखारे यातून त्या भूक भागवायच्या. सिंधूताईंना अशा या जीण्यात एक अनाथ मुलगा रस्त्यावर भेटला. त्याला कुणीच नव्हते. त्या मुलाच्या आई बनल्या आणि मग हा सिलसिला सुरु झाला. त्यांची स्वतःची ममता ही मुलगी आणि सुमारे दीड हजाराहून अधिक अनाथ मुले त्यांनी आई म्हणून वाढवली. अनेक मुलींची लग्ने लाऊन दिली. संस्था उभारल्या आणि लोकांना भेटून, सांगून त्यांनी मदत मिळवली. अनाथ मुलांचे संगोपन केले. सिंधूताईंनी बाल निकेतन, हडपसर, चिखलदऱयाचे सावित्रीबाईफुले वसतीगृह, सासवडचे ममता बाल सदन, वर्धाचे अभिनव बाल भवन आणि गोपिका गाय रक्षक केंद्र अशा संस्था उभारल्या. त्यांना घरातून मारहाण करुन गोठय़ात टाकण्यात आलं होत. तिथेच त्यांनी मुलीला जन्म दिला व त्या रात्री गोठय़ातील गाईंनी त्यांना आधार दिला. यास्तव सिंधूताईंचा गाईवर विशेष जीव होता. सिंधूताईंच्या जीवनावर आधारित ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा मराठी चित्रपट निर्माण झाला व तो खूप गाजला. लंडन फिल्म फेस्टीव्हलसाठी या चित्रपटाची निवड झाली होती. सिंधुताईंचे लौकीक शिक्षण फार नव्हते. त्यांचे दिसणे-वावरणेही हायफाय नव्हते पण त्यांचा अभ्यास, तळमळ, जिद्द, संपर्क, वाचन आणि वाणी अप्रतिम होती. सुरेश भटांच्या गझला त्यांना मुखोद्गत होत्या. आपल्या जीवनाची कहाणीही त्या उत्तम सादर करायच्या. त्यांचे वाचन उत्तम होते. डॉक्टर डी.वाय.पाटील ते डॉक्टर पतंगराव कदम आणि छोटय़ा गावातील एखादा सरपंच ते सुपरस्टार अभिताभ बच्चन सर्वांपर्यंत त्या पोहचल्या होत्या आणि मिळेल तेथून मदत आणून ती त्या अनाथ मुलांसाठी पोहचवत होत्या. सिंधूताईंना अनेक संस्थांनी अनेक पुरस्कार दिले. हा त्यांचा, त्यांच्या कार्याचा गौरव होता. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सिंधूताईना अलीकडेच पद्मश्री पुरस्काराने गौरवले होते आणि देशाने त्यांच्या समाजकार्याला वंदन केले. पण आजही त्यांचे काम गरजेचे आहे. समाज शिक्षित होतो आहे. प्रगत होतो आहे. पण अनाथांचे प्रश्न आणि समस्या संपलेल्या नाहीत. मुलींना जन्मताच बेवारस, अनौरस रस्त्यावर टाकण्याचे आणि वाममार्गाला लावण्याचे प्रकारही थांबलेले नाहीत. अनाथ मुलांचाही गैरवापर करणाऱया टोळय़ा आहेत. माणसे शिकतात पण शहाणी होत नाहीत अशा काळात सिंधूताईंचे शहाणपण आणि सेवाभाव अधोरेखित होतो. अशा कामाची गरज स्पष्टपणे जाणवते. संकटावर मात करत काही माणसे वैयक्तिक यश मिळवतात पण वैयक्तिक संकटे सोसून मागे टाकून सामाजिक कामासाठी वाहून घेणे त्यात यश मिळवणे हे सोपे नाही. त्यासाठी अशी एखादी सिंधूताई जन्मावी लागते जी हजारो अनाथांची माय बनते. आधार बनते. सिंधूताईंची महाराष्ट्रात अनेक जिह्यात, गावात कार्यक्रम, भाषणे झाली आहेत. त्या सांगायच्या एखादी बाई सात-आठ मुलांची आई, महाभारतात गांधारी शंभर मुलाची आई पण मी हजारो मुलांची आई आहे. माझी मुले डॉक्टर आहेत. वकील आहेत, प्राध्यापक आहेत. माई हे सांगताना त्यांचा चेहरा फुलून यायचा. आनंदाने त्यांचा उर भरायचा अशी माय होणे सोप नाही. त्यासाठी मन मोठे लागते. निर्धार पक्का असावा लागतो. अथक कष्टाची तयारी लागते. तेव्हाच चित्तर कथा बनलेली सिंधूताई सपकाळ प्रत्यक्षात साकारते. सिंधूताईंच्या संस्थात अनेक मुले आहेत. त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याच जोडीला या मुलांना आपल्या डोक्यावरील मातृछत्र हरपले असे वाटता कामा नये याचीही दक्षता घेतली पाहिजे. सिंधूताईंना जात, पक्ष, धर्म नव्हता. दुःख हीच शक्ती होती. दुःख आणि भूक यांचे चटके सहन करत तीच प्रेरणा मानून त्यांनी अनेकांना जीवन दिले. अनेकांना आधार दिला. अनेकांच्या जीवनाला आकार दिला. आता ही मुलेच सिंधूताईंची शक्ती म्हणून सरसावली पाहिजेत. काळ, कपडे बदलले असले तरी प्रश्न कायम आहेत. समाजातील प्रश्नांना भिडणारी माणसे दुर्मिळ आहेत. अनेक सिंधूताईंची गरज आहे.
Previous Articleकासव घरटय़ांचा डेटा आता एका ‘क्लिक’वर मिळणार!
Next Article पंतप्रधानांची कार वाहतूक कोंडीमुळे अडकली
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.