सुरक्षा व्यवस्थेत मोठी त्रुटी, पंजाब सरकारवर ढिलाईचा आरोप
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सुरक्षा व्यवस्थेतील मोठय़ा त्रुटीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचा पंजाब दौरा अर्धवट सोडावा लागला. बुधवारी भठींडा येथून हुसैनीवाला राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाकडे जात असताना वाटेत एका फ्लायओव्हरवर त्यांची कार 20 मिनिटे अडकून पडली. या रस्त्यावर त्याचवेळी काहीजण आंदोलन करत होते. त्यामुळे रस्ता अडवला गेला होता. पंजाब पोलिसांनी वेळीच कारवाई करुन रस्ता मोकळा न केल्याने जवळपास 20 मिनिटे कार रस्त्यावरच थांबून होती. यानंतर पंतप्रधान मोदींची जाहीर सभा रद्द करण्यात आली, तर दौरा अर्धवट सोडण्यात आला. ‘तुमच्या मुख्यमंत्र्यांचा मी आभारी आहे. कारण निदान मी जिवंत राहिलो, अशी खोचक टिप्पणी नंतर पंतप्रधान मोदींनी पंजाबच्या अधिकाऱयांना उद्देशून केली.
केंद्रीय गृह मंत्रालयाने ही घटना गंभीर असल्याचे स्पष्ट केले. पंजाब सरकारच्या ढिलाईमुळे पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी त्रुटी राहिल्याचे प्रतिपादन करण्यात आले. या संपूर्ण प्रकाराचा अहवाल पाठवा असा आदेश केंद्रीय गृह विभागाने पंजाब सरकारला दिला आहे. या प्रकाराची केंद्राकडून चौकशीही केली जाणार आहे.
नेमका प्रकार काय
बुधवारी सकाळी पंतप्रधान मोदी भठिंडा विमानतळावर पोहचले होते. तेथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आपल्या कारताफ्यासह निघाले. स्मारकापासून 30 किलोमीटर अंतरावर एका फ्लायओव्हरवर त्यांचा कारचा ताफा आल्यानंतर आश्चर्यकारकरित्या हा फ्लायओव्हर काही आंदोलकांनी अडविल्याचे दिसून आले. त्यामुळे कारचा ताफा तेथेच थांबविण्यात आला. त्यानंतर साधारणतः 20 मिनिटे मार्ग बंदच होता. त्यामुळे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आणि ताफा माघारी फिरला.
केंद्र आणि राज्यात वाद
हुतात्मा स्मारकापर्यंत हेलिकॉप्टरने जाण्याचा कार्यक्रम आधी निर्धारित करण्यात आला होता. तथापि, हवामान अनुकूल नसल्याने कारने जाण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती बऱयाच आधी राज्य सरकारला देण्यात आली होती, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. मात्र, अचानकच मार्ग बदलण्यात आल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. यावर केंद्र आणि राज्य यांच्यात वाद निर्माण झाला आहे.
भाजप संतप्त
या घटनेमुळे भारतीय जनता पक्ष संतप्त झाला आहे. पंजाब सरकारने जाणून बुजून पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी ठेवली. राज्याचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्याशी फोनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद असल्याचे दिसून आले. यावरुन हा सर्व प्रकार मुद्दाम ठरवून करण्यात आला होता, हे उघड होते, असे भाजपचे म्हणणे आहे. काँगेसच्या या संकुचित वृत्तीचे कोणत्याही लोकशाहीप्रेमी नागरिकाला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी दिली.
काँगेसचा इन्कार
पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारकडून कोणतीही त्रुटी ठेवण्यात आली नव्हती. त्यांच्या जाहीर सभेला केवळ 700 लोकांची उपस्थिती होती. म्हणून सभा रद्द करण्यात आली. निमित्त मात्र, सुरक्षा त्रुटीचे सांगण्यात आले, अशी टिप्पणी काँगेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी केली. मुख्यमंत्री चन्नी यांनीही अशीच प्रतिक्रिया या प्रसंगानंतर काही वेळाने व्यक्त केली.
माहिती दिली होती
पंतप्रधान मोदी हुतात्मा स्मारकाकडे कारने जाणार आहेत, ही माहिती राज्य सरकारच्या संबंधित विभागाला बऱयाच आधी, म्हणजे ते भठिंडा येथे पोहचल्यानंतरच देण्यात आली होती. तसेच कोणत्या मार्गाने त्यांच्या कार्सचा ताफा जाणार आहे, हेदेखील स्पष्ट करण्यात आले होते. मार्ग मोकळा आहे, हे सुनिश्चित झाल्यानंतरच प्रवास सुरु झाला होता, असे केंद्रीय गृहविभागाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. राज्य सरकार आता आपली ढिलाई झाकण्यासाठी जबाबदारी ढकलत आहे, असा आरोपही केंद्रीय गृह विभागाने केला आहे. हे प्रकरण पंजाब सरकारवर शेकू शकते, असे मत काही राजकीय तज्ञांनीही व्यक्त केले आहे. केंद्रीय गृह विभागाकडूनही या प्रकरणी चौकशीचा आदेश दिला जाऊ शकतो.
राज्य सरकारकडून नियमभंग ?
सुस्थापित नियमांच्या अनुसार पंतप्रधान मोदी जेव्हा राज्यांचा दौरा करतात तेव्हा त्यांच्या प्रवासासाठी पर्यायी मार्गाची आधीच व्यवस्था करणे ही राज्य सरकारची जबाबदारी असते. त्यामुळे पंजाब सरकारने असा पर्यायी मार्ग सज्ज ठेवावयास हवा होता आणि त्याची माहिती केंद्र सरकारला द्यावयास हवी होती. तथापि, पंजाब सरकारने हा नियम पाळला नाही. त्यामुळे गंभीर प्रसंग उद्भवला. या ढिलाईची कारणे शोधली जातील. राज्य सरकारला या सर्व घटनाक्रमावर स्पष्टीकरण द्यावेच लागेल, अशी माहिती केंद्रीय गृह विभागाने नंतर दिली.