प्रतिनिधी / शिरोळ
सर्वपक्षीय पूरग्रस्त संघर्ष समितीच्या प्रमुखांची उद्या, मंगळवारी (दि.10) जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी, अन्यथा बुधवार पासून सुरू असलेले पंचनामे बंद पाडू व गाव चावडीला टाळे ठोकून उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडू असा इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख व संयोजक धनाजी चुडमुगे यांनी दिला. यावेळी तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी आपल्या भावना शासनास तातडीने कळवू जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठकीची वेळ व तारीख घेऊन बैठक घेण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही आंदोलनकर्त्यांना दिली.
शिरोळ तालुका सर्वपक्षीय पूरग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने आज, भव्य मोर्चा काढण्यात आला. शिवाजी चौकातून मोर्चात सुरुवात झाली. शहरातील मुख्य मार्गावरून तहसील कार्यालयावर आल्यावर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. शिरोळ तालुक्यातील 54 पक्की 42 गावांना महापुराचा तडाखा बसला आहे. या नुकसानीचे चुकीच्या पद्धतीने पंचनामे सुरू आहेत. प्रशासनाच्या वतीने आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. चुकीचे पंचनामे करीत असतील तर आमच्यावर कितीही गुन्हे दाखल करा आम्ही समर्थ असल्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी दिला.
महापुराचा तडाख्याने सर्वच घटकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे महापूर येऊ नये याची कायमस्वरूपी उपाययोजना करावी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, 100% पूरग्रस्त गावे जाहीर करून लवकरात लवकर मदत देण्याची मागणी माजी आमदार उल्हास पाटील यांनी केली.
यावेळी भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, डॉ संजय पाटील, जि प सदस्य विजय भोजे, अशोकराव माने, मेजर प्रकाश पाटील, दिगंबर सकट, विलास कांबळे, आक्काताई तेली, पांडुरंग गायकवाड यांच्यासह अनेकांनी सरकारवर कडाडून टीका केली. या मोर्चात पूरग्रस्त भागातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.