सलग दोन पराभवामुळे संघावर अधिक दडपण, अंतिम एकादशमध्ये अश्विनला निवडण्यावरुन वाद
अबु धाबी / वृत्तसंस्था
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सुपर-12 फेरीत सलग 2 पराभवांमुळे टीकेच्या केंद्रस्थानी सापडलेल्या भारतीय संघाचा आज (बुधवार दि. 3) अफगाणिस्तानविरुद्ध मुकाबला होत असून सातत्याने संघात फेरबदल करण्यासाठी ओळखला जाणारा विराट येथे अश्विनला संधी देण्यासाठी अनुकूल असणार का, हा कळीचा प्रश्न असेल. आजची ही लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाईल.
या स्पर्धेतील पहिल्या दोन लढतीत पाकिस्तान व न्यूझीलंडविरुद्ध लागोपाठ दोन पराभव पत्करावे लागल्यानंतर भारताचे स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच धोक्यात आले आहे. आता अफगाण, स्कॉटलंड व नामिबियाविरुद्ध उर्वरित तिन्ही सामने मोठय़ा फरकाने जिंकणे आणि अफगाणविरुद्ध न्यूझीलंडचा संघ पराभूत व्हावा, अशी अपेक्षा करणे, इतकेच भारताच्या हाती असणार आहे.
अफगाणिस्तानने यापूर्वी स्कॉटलंड व नामिबियाविरुद्ध एकतर्फी विजय नोंदवले. शिवाय, असिफ अलीने एकाच एकाच षटकात 4 षटकार खेचल्याचा अपवाद वगळता पाकिस्तानविरुद्ध सामन्यातही त्यांनी उत्तम वरचष्मा गाजवला होता. आज भारताविरुद्ध देखील असाच झुंझार खेळ साकारण्याचा त्यांचा मानस असू शकेल.
नबी, रशिदचा अनुभव महत्त्वाचा
मोहम्मद नबी व रशिद खान यांचा टी-20 क्रिकेटमधील उत्तम अनुभव अफगाणसाठी उपयुक्त ठरु शकतो. या खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी धक्के दिले तर भारतासाठी दि. 24 ऑक्टोबर रोजी सुरु झालेला कर्दनकाळ येथेही कायम राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
मागील सामन्यात पाठदुखीमुळे खेळू न शकलेला सुर्यकुमार यादव येथे तंदुरुस्त असल्यास संघात परतू शकेल. इशान किशनला मध्यफळीत खेळवले जाण्याची शक्यता आहे. हार्दिक पंडय़ाबाबत मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे. स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून संघात असलेल्या पंडय़ाने 2 सामन्यात 35 चेंडूत केलेल्या 31 धावा अर्थातच त्याच्या लौकिकाला साजेशा नाहीत. रशिद खान गोलंदाजीला आल्यानंतर मधल्या षटकात भारतीय फलंदाजी कशी होईल, यावर बरीच समीकरणे अवलंबून असतील. गुलाबदिन नईब विकेट-टू-विकेट मारा करण्यासाठी ओळखला जातो. त्याला सामोरे जाणेही आव्हानात्मक झाले तर यात आश्चर्याचे कारण नसेल.
हमिद-नवीनवर गोलंदाजीतील भिस्त
अफगाणिस्तानचे हमिद हसन व युवा नवीन उल हक हे नव्या चेंडूवरील जोडीदार अनुभवी आहेत. मात्र, केएल राहुल व रोहित शर्मा यांनी त्याचा सहज समाचार घेणे अपेक्षित आहे.
कोहली तिसऱया प्रयत्नात तरी नाणेफेक जिंकणार का, हे देखील येथे पहावे लागेल. कोहलीने नाणेफेक जिंकले तर डय़ू फॅक्टर लक्षात घेता प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती देऊ शकेल. पण, अफगाणने नाणेफेक जिंकून भारताला 145 ते 155 धावांच्या घरात रोखले व शहझादला सूर सापडला तर या लढतीत देखील काहीही चित्र दिसू शकेल. यामुळे, अर्थातच विराटसेनेला प्रत्येक आघाडीवर दक्ष रहावे लागेल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सुर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंडय़ा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर, जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार, राहुल चहर, वरुण चक्रवर्ती, रविचंद्रन अश्विन.
अफगाणिस्तान ः मोहम्मद नबी (कर्णधार), हझरतुल्लाह, अहमद शहझाद, गुलाबदिन नईब, नवीन उल हक, रशिद खान, हमिद हसन, रहमनुल्लाह गुरबाझ, नजिबुल्लाह झॅद्रन, करीम जनत, मुजीब उर रहमान, हसमतुल्लाह शाहिदी, फरीद अहमद, उस्मान घानी.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
अश्विनबाबत काय निर्णय घेणार?
भारतीय संघातर्फे टी-20 क्रिकेटमध्ये आता विराटकडे केवळ तीनच सामन्यात नेतृत्व असू शकते. या पार्श्वभूमीवर, तो संघनिवडीत काय बदल करणार आणि त्यातही प्रामुख्याने अश्विनसारख्या अव्वल खेळाडूला पुन्हा संघाबाहेर ठेवणार का, हा मुख्य प्रश्न असेल.
अश्विन विद्यमान खेळाडूंच्या पिढीतील दिग्गजांपैकी एक आहे. पण, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गतवर्षी पुनरागमन केल्यानंतर एखादी स्पर्धा किंवा मालिकेच्या मध्यापर्यंत संघाबाहेर राहण्याची त्याच्यासाठी ही पहिलीच वेळ आहे. मुळात, 4 वर्षांच्या अंतराने त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संधी मिळाली, त्यावेळीही कर्णधाराचा या निर्णयाला आक्षेपच होता, असे मानले जाते. मागील लढतीत अश्विनऐवजी खेळणाऱया वरुण चक्रवर्तीने सपशेल निराशा केली, त्यावेळी अनुभवाचा मुद्दा चर्चेत आला. वरुण चक्रवर्ती दडपण हाताळू शकला नसल्याचे त्या लढतीत स्पष्ट झाले होते.
गुणवत्ता व कौशल्य या दोन्ही आघाडय़ांवर सध्याच्या फिरकीपटूंमधील एकही जण अश्विनच्या आसपासही नाही. पण, अश्विनच्या कामगिरीत सातत्याचा अभाव असतो, ही मुख्य चिंता असून याच कारणामुळे त्याला 4 वर्षांपूर्वी संघातील स्थान गमवावे लागले होते. मात्र, येथील परिस्थिती वेगळी असल्याने त्याला संधी मिळणार का, हे पहावे लागेल.
अफगाणच्या खेळाडूंना अश्विनसारख्या जागतिक दर्जाच्या फिरकीपटूंना सामोरे जाण्याची सवय नाही, याचा लाभ घेतला जाणार का, हे देखील नाणेफेकीवेळी स्पष्ट होईल. डावखुरा हझरतुल्लाह व धडाकेबाज मोहम्मद शहझाद फूटवर्कवर फारसा भर देत नाहीत. त्यामुळे, अश्विनला संधी दिली गेल्यास त्याच्याविरुद्ध ते किती यशस्वी होणार, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
मैदान बदलले, नशीब पालटणार का? भारतीय संघ दुबईतील पहिल्या दोन सामन्यानंतर आज अबु धाबीत या स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळेल. दुबईत पाकिस्तान व न्यूझीलंडविरुद्ध दोन्ही लढतीत भारत चारीमुंडय़ा चीत झाला. पण, आता अबु धाबीत सामना असून यामुळे मैदान बदलल्यानंतर नशीबही पालटेल, अशीच अपेक्षा असणार आहे