नवी आगळीक : उपग्रहीय छायाचित्रांमुळे पर्दाफाश
वृत्तसंस्था / इटानगर
लडाखमध्ये भारताकडून दणका मिळाल्यावर चीन आता ईशान्येत नवे संकट निर्माण करू पाहत आहे. चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमेनजीक तीन नवी गावे वसविली आहेत. उपग्रहीय छायाचित्रांनुसार हे स्थान बुम ला खिंडीपासून सुमारे 5 किलोमीटरच्या अंतरावर भारत, चीन आणि भूतानच्या सीमेनजीक आहे. याचबरोबर या गावांमध्ये चीनने लोकांनाही वसविले आहे. या क्षेत्रावरून चीन पूर्वीपासूनच स्वतःचा दावा करत आला आहे.
चीनने अरुणाचलला लागून असलेल्या सीमेवर किमान तीन गावे स्थापित केली आहेत. चीनचे हे पाऊल अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेसोबत स्वतःचे क्षेत्रीय दावे बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरू शकते. चीनने अरुणाचलप्रदेशाला मान्यता देण्यास वारंवार नकार दिला आहे. 1962 च्या युद्धात चीनने या क्षेत्राच्या मोठय़ा भूभागावर कब्जा केला होता.
फेब्रुवारीच्या सुमारास या क्षेत्रात केवळ एकच गाव वसविण्यात आले होते. ज्यात 20 च्या आसपास लाल छप्पर असलेली घरे दिसून येत होती. 28 नोव्हेंबर रोजी दुसऱया उपग्रहीय छायाचित्रात 50 पेक्षा अधिक घरांसोबत तीन नवे एन्क्लेव्हही दिसून येत आहेत, जे परस्परांपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर निर्माण करण्यात आले आहेत. त्यांना जोडण्यासाठी सर्व ऋतूंमध्ये खुल्या राहणाऱया रस्त्याचीही निर्मिती करण्यात आली आहे.
चीनची जुनी खेळी
चीन स्वतःच्या सीमावर्ती दाव्यांना बळ देण आणि सीमा घुसखोरीला वाढविण्यासाठी भारतीय सीमेवर कम्युनिस्ट पक्षाचे समर्थक हान चिनी आणि तिबेटी सदस्यांना वसविण्याच्या रणनीतिचा वापर करत राहिला आहे .दक्षिण चीन सागरावर कब्जा करण्यासाठीही चीन याच रणनीतिचा वापर करत आहे.
भूतानच्या भूमीवर अतिक्रमण
एक आठवडय़ापूर्वी प्राप्त उपग्रहीय छायाचित्रांमधून चीनने भूतानच्या भूमीवरही दोन गावे वसविल्याचा खुलासा झाला होता. 2017 च्या डोकलाम संघर्षाच्या ठिकाणापासून ही जागा केवळ 7 किलोमीटर अंतरावर आहे. चीनने भूतानच्या अमो चू नदीसोबत लागून असलेल्या भूमीवर हे अतिक्रमण केले आहे.