अहवाल प्रसिद्ध, कृषीक्षेत्राचा आधार मोलाचा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाच्या आर्थिक परिस्थितीचा सप्टेंबर महिन्याचा अहवाल केंद्रीय अर्थ विभागाने प्रसिद्ध केला आहे. अर्थव्यवस्था आता गतिमान होत असून प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीतही विक्रमी वाढ झाली असल्याचा निष्कर्ष त्यात काढण्यात आला आहे. कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेला मोलाचा आधार मिळाला आहे.
भारतात होणाऱया प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. ही वाढ वार्षिक 62 टक्के या विक्रमी गतीने होत आहे. कोरोनाचा दुसरा उदेक क्षीण होण्याच्या मार्गावर असल्याने अर्थव्यवस्थेला गतिमानता प्राप्त झाली असून सर्व क्षेत्रांमध्ये रोजगार आणि गुंतवणूक या दोन्ही महत्वाच्या निकषांमध्ये झपाटय़ाने सुधारणा होत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
गुंतवणुकीत वाढ
एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये भारतात 2 लाख 5 हजार 867 कोटी रुपयांची नवी प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक झाली. गेल्यावर्षी याच कालावधीच्या तुलनेत ती 62 टक्क्यांनी जास्त आहे. भांडवली बाजारात (कॅपिटल मार्केट) 22,565 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक झाली. भारताचा शेअरबाजार आणि रोखे बाजारात झालेली ही गुंतवणूक विकसनशील देशांमध्ये सर्वात जास्त आहे.
एप्रिल ते सप्टेंबरमध्ये विक्रम
विद्यमान आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत शेअरबाजार आणि रोखे बाजारात 54,155 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक झाली आहे. ती ब्राझीलच्या खालोखाल आहे, अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्था जोरदार
देशाच्या ग्रामीण भागात मागणीत मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. ही वाढ प्रत्येक क्षेत्रात दिसून आली आहे. कृषी क्षेत्राचा आधार गेल्या सहा महिन्यात मोठय़ा प्रमाणात अर्थव्यवस्थेला मिळाला आहे. कृषी क्षेत्र 4.5 टक्क्यांचा विकास दर गाठेल अशी शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागात एफएमसीजी आणि वाहन क्षेत्राने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसते, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.